Join us  

नियंत्रण सुटल्यामुळे टीएमटीचा ‘तो’ अपघात

By admin | Published: September 23, 2014 12:09 AM

येऊर ते ठाणे स्थानक अशी जाणाऱ्या ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) बसमधील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळेच तो अपघात झाला

ठाणे : येऊर ते ठाणे स्थानक अशी जाणाऱ्या ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) बसमधील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळेच तो अपघात झाला. त्यावेळी बसमध्ये ब्रेक फेल किंवा तांत्रिक बिघाड झाला नसल्याचा निर्वाळा प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी (आरटीओ) दिला आहे. यात तथ्य आढळल्यास संबंधित चालकाची विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती टीएमटी प्रशासनाने दिली आहे.पाटोणपाडा - ठाणे रेल्वे स्थानक ही बस १४ सप्टेंबर रोजी येऊर येथून येतांना हवाई दलाच्या केंद्राजवळ अचानक एका झाडावर आदळल्याने अपघात झाला होता. ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याचे चालक सचिन देवळेकर यांनी त्यावेळी सांगितले होते. मात्र, आरटीओ चे निरीक्षक कमलेश चव्हाण यांनी केलेल्या तपासणीत या बसचे ब्रेक फेल झालेले नसल्याचे आढळून आले असून तांत्रिकदृष्टया ही बस फिट असल्याचा अहवालही त्यांनी दिला आहे. अर्थात, टीएमटीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही बस एअर ब्रेकची असून चालू बसमध्ये ब्रेकमधील हवा उतरली जाते. त्यामुळे ब्रेक व्यवस्थित लागत नाही. असाच प्रकार घडल्यामुळे चालक देवळेकर यांचे वाहनाला चुकवितांना बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्यांनी बाजूला गाडी नेल्यानेच ३० ते ३५ प्रवाशांचे प्राण वाचले. या अपघातात चार प्रवासी जखमी झाले होते. अर्थात, गाडी उभी करुन एक्सलेटर देऊन हवा भरली गेली तर ब्रेक व्यवस्थित लागतात, अशीही माहिती या अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)