Join us  

रेल्वे प्रवाशांच्या मदतीला लालपरी धावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 4:06 AM

एसटी बसने ५,८०० प्रवाशांना सुखरूप सोडलेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची ...

एसटी बसने ५,८०० प्रवाशांना सुखरूप सोडले

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याने कसारा, इगतपुरी येथे प्रवासी अडकून पडले होते. या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने गुरुवारी पहाटे ४ वाजता तातडीने १३३ बसेस सोडल्या. या बसेसमधून सुमारे ५,८०० प्रवाशांना सुखरूप सोडले, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याने हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला. रेल्वे बंद पडल्याने हजारो प्रवाशी कसारा, इगतपुरी स्थानकात अडकून पडले होते. याची माहिती मिळताच रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने ठाणे विभागातून ९३ आणि नाशिक विभागातून ४० अशा सुमारे १३३ बसेस उपलब्ध करून दिल्या. गुरुवारी पहाटे ४ वाजल्यापासून ही वाहतूक सुरू करण्यात आली. मुसळधार पावसात एसटी महामंडळाने तातडीने बसेस उपलब्ध करून दिल्यामुळे सुमारे ५,८०० हून अधिक प्रवाशांना सुखरूप सोडण्यात आले. त्यामुळे या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.

पावसामुळे पुणे-मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बंद पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. या प्रवाशांची गैरसोय दूर करण्याकरिता एसटी महामंडळाने पुणे स्थानक येथून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी ६५ जादा बसेस सोडल्या, तर मुंबईहून ९ बसेस सोडण्यात आल्या, अशी माहितीही अनिल परब यांनी दिली.