Join us  

मागाठाणे येथील वनखात्याच्या जमिनीवरील हजारो झोपडपट्टीवासीयांना मिळणार हक्काचे घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेली अनेक वर्षे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील वनखात्याच्या जमिनीवरील हजारो झोपडपट्टीवासीयांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेली अनेक वर्षे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील वनखात्याच्या जमिनीवरील हजारो झोपडपट्टीवासीयांना हक्काचे घर मिळणार आहे. या मतदारसंघातील केतकीपाडा, धारखाडी दहीसर (पूर्व ), दामूनगर, भीमनगर, गौतमनगर, आंबेडकरनगर, जानूपाडा, पांडे कम्पाउंड, कांदिवली (पूर्व) वैभवनगर येथील सुमारे ४० हजार झोपडपट्टीवासीय वास्तव्य करत आहे. आता त्यांना या मतदारसंघातील १० किमी परिसरात सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत त्यांना हक्काचे घर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. तसेच या संदर्भात विशेष धोरण आखण्याचे ठोस निर्देशदेखील त्यांनी दिले.

गेली सुमारे सहा वर्षे येथील शिवसेनेचे स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांनी सातत्याने प्रयत्न केले होते आणि विधानसभेत आवाज उठवला होता. त्यामुळे येथील हजारो झोपडपट्टीवासीयांना अनेक वर्षांनंतर मोठा दिलासा मिळाला.

विकासकांना या बदल्यात वाढीव चटई क्षेत्र देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती आमदार सुर्वे यांनी दिली.

तसेच या बैठकीत विकास आराखड्यात येणाऱ्या २०११च्या पात्र झोपड्यांची यादी करून त्यांचे पुनर्वसन करण्याचे आदेश मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिली.

शुक्रवारी दुपारी एकनाथ शिंदे यांच्या दालनात या संदर्भात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, नगरविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद सुनील प्रभू, आमदार प्रकाश सुर्वे, वनखात्याचे अप्पर सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, जिल्हाधिकारी शहर व उपनगर, एसआरएचे मुख्य कार्याकारी अधिकारी, पालिका उपायुक्त विश्वास शंकरवार आदी मान्यवर उपस्थित होते.