Join us  

शिक्षकांनो, मोबाइल अ‍ॅपने माहिती गोळा करा - निवडणूक अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 3:36 AM

छायाचित्र मतदार याद्यांचे पुनर्परीक्षणाचे काम म्हणून निवडणूक अधिका- यांनी आता मुंबईतील शिक्षकांना घरोघरी जाऊन मोबाइल अ‍ॅपद्वारे माहिती जमा करण्याचे फर्मान सोडले आहे.

मुंबई : छायाचित्र मतदार याद्यांचे पुनर्परीक्षणाचे काम म्हणून निवडणूक अधिका- यांनी आता मुंबईतील शिक्षकांना घरोघरी जाऊन मोबाइल अ‍ॅपद्वारे माहिती जमा करण्याचे फर्मान सोडले आहे. अशा अशैक्षणिक कामांतून शिक्षकांची तातडीने सुटका करा, अशी मागणी शिक्षक परिषदेने मुख्य निवडणूक अधिका-यांकडे केली आहे.शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले की, मुंबईच्या उत्तर विभागातील शिक्षकांना बीएलओ म्हणजेच, मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांची कामे देण्यात आली आहेत. त्या अंतर्गत छायाचित्र मतदार याद्यांचे काम, मतदार याद्या प्रसिद्ध करणे, मतदारांचे दावे व हरकती स्वीकारणे, पुरवणी मतदार यादी तयार करणे व घरोघरी जाऊन मोबाइल अ‍ॅपद्वारे माहिती गोळा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शिकवायचे की, अशैक्षणिक कामे करायची, असा प्रश्न शिक्षकांपुढे निर्माण झाला आहे.दहावीचा अभ्यासक्रम, विज्ञान प्रदर्शन, क्रीडा महोत्सव, स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहली असे उपक्रम सध्या शाळांमध्ये सुरू आहेत. त्यातच शिक्षकांना अशा अशैक्षणिक कामाला जुंपल्यास, इतर उपक्रमांवर परिणाम होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती विद्यार्थी परिषदेने व्यक्त केली आहे. या आधीच अनेक आॅनलाइन कामांमुळे शिक्षक वर्ग बेजार आहे. त्यात या कामामुळे आणखी एका अशैक्षणिक कामाची भर पडली आहे.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राला खीळ!एकीकडे राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रांतर्गत शाळा प्रगत करण्याबाबत शाळांना ‘ए ग्रेड’मध्ये आणण्याबाबत दबाव वाढत आहे. त्याचदरम्यान, अशा अशैक्षणिक कामांमुळे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राला खीळ बसणार असल्याची भीती अनिल बोरनारे यांनी व्यक्त केली आहे. म्हणूनच तातडीने शिक्षकांवर टाकलेली बीएलओची कामे रद्द करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे.शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन!प्रत्यक्ष निवडणूक, दशवार्षिक जनगणना व आपत्ती व्यवस्थापन ही तीन कामे वगळता अन्य कोणतीही अशैक्षणिक कामे शिक्षकांना देऊ नयेत, असे शिक्षणाचा अधिकार कायद्यात (आरटीई) नमूद केलेले आहे. अशा परिस्थितीतही मोबाइल अ‍ॅपचे काम शिक्षकांच्या गळ्यात मारून, निवडणूक अधिकारी आरटीईचे उल्लंघन करीत असल्याचा आरोपही अनिल बोरनारे यांनी केला आहे.

टॅग्स :मुंबई