Join us  

जातीय हत्यांबाबत कडक कारवाई करा; सामाजिक नेत्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 1:00 AM

समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न निंदनीय

मुंबई : नागपूर जिल्ह्यात व पुण्यात जातीयवादातून दोन जणांची निर्घृण हत्या झाली. यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीशील समजल्या गेलेल्या परंपरेला काळिमा फासली गेला. या दोन्ही अमानुष, माणुसकीला कलंक लावणाऱ्या घटनांचा जाहीर निषेध करीत हत्यांना जबाबदार असलेल्या गुन्हेगारांना कायद्यानुसार कठोर शासन झाले पाहिजे, अशी मागणी विविध सामाजिक नेत्यांनी सरकारकडे केली आहे.पी. बी. सावंत, भालचंद्र मुणगेकर, एन. डी. पाटील, बाबा, प्रेमानंद गज्वी, जियसंगराव पवार, प्रताप आसबे, प्रवीण गायकवाड, प्रज्ञा दया पवार, श्रीमंत कोकाटे, जयंत पवार,मधु कांबळे, सुभाष लोमटे, मधु मोहिते यांचा मागणी करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.सोशल मिडियावरील दोन्ही समाजाच्या प्रतिक्रि या अत्यंत प्रक्षुब्ध व स्फोटक आहेत. त्या अधिक प्रक्षुब्ध करून राज्यात फार मोठ्या प्रमाणावर सामाजिक-राजकिय अस्थिरता निर्माण करण्याचा काही समाज विरोधक हितसंबंधी प्रयत्न करीत आहेत. त्यांना कोणत्याही परिस्थितीत यश येणार नाही आणि राज्यात अस्थिरता निर्माण होणार नाही, हे पाहणे आवश्यक आहे. याची जबाबदारी दलितांवर असली, तरी बहुसंख्याक असलेल्या मराठा समाजावर ती अधिक मोठी आहे. दोन्ही समाजात कष्टकरी वर्ग प्रचंड संख्येने आहे. दलित समाजाने ‘जशास तसे’ उत्तर देण्याच्या भूमिकेत असणे हितावह नाही, तसेच मराठा समाजाने भ्रामक सामाजिक प्रतिष्ठा जोपासणे अयोग्य आहे. विचारांच्या देवाणघेवाणीतूनच सामाजिक प्रगती साध्य होते, असा आमचा दृढ विश्वास असल्याचे या नेत्यांनी म्हटले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या समतवादी विचारांचा फार मोठा वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे. जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू यांनी सामाजिक सुधारणांसाठी केलेल्या अथक प्रयत्नांचा परिणाम म्हणून गेल्या काही वर्षात दोन्ही समाजात एक मोठा प्रगतीशील वर्ग निर्माण झाला आहे. त्यामुळे सामाजिक अभिसरण व विचारांची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी सतत प्रयत्न करणे, ही या प्रगतीशील वर्गाची जबाबदारी आहे. अशा गंभीर सामाजिकदृष्ट्या संवेदनशील घटनांबाबत सोशल मीडियातून व्यक्त होताना प्रत्येकाने जबाबदारीचे भान ठेवणे अपेक्षित आहे, असे आवाहन या सामाजिक नेत्यांनी केले आहे.