अरविंद म्हात्रे, चिकणघरकल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक १२ शहाड इतर प्रभागांपेक्षा लहान आहे. तरी येथील नागरी समस्या सुटलेल्या नाहीत. शहाड गावठाण मनपात समाविष्ट झालेले असले तरी. गावांचे स्वरुप अद्याप खेडवळच आहे. गावठाण अंतर्गत अद्याप असुविधांचा वेढा आहे. पिण्याचे पाणी, पायवाटा, सफाई यासारख्या समस्या सोडविल्याचा दावा येथील नगरसेवक करीत आहे. मात्र गावातील नागरीक समाधानी नाहीत. सफाईची नियमितता नसल्याने आरोग्याची समस्या निर्माण झालेली आहे. शहाड गाव शहरात विलीन आहे. परंतु परिस्थिती ग्रामपंचायतीतल्या गावासारखीच आहे.या प्रभागात शहाड गाव, नवरंग सोसायटी अंबिकानगर, राजनिकेतन कॅम्पस कॉर्नर, अवनी सोसायटी, हॅप्पी होम्स, शहाड स्टेशन पश्चिमेचा परिसर आणि बंदर पाडा आदी परीसर येत आहे. शहाड स्टेशन ते मोहने-राडे आणि शहाड गाव असे भौगोलिक क्षेत्र असलेल्या या प्रभागात लाकडाच्या आणि मार्बलच्या डेपोंची मोठ्या प्रमाणात संख्या असून दिवसभर ध्वनी प्रदूषणाला सामारे जावे लागते. या प्रदूषणाकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर अ प्रभाग अधिकारी आणि नगरसेवकांचेही लक्ष नसल्याने प्रदूषणात भर पडत आहे. वालधुनी नदीच्या नाल्याच्या कडेलाच हा प्रभाग असल्याने पावसाळ्यात प्रभागाच्या बहुसंख्य भागात पाणी भरते याचा कायमचा बंदोबस्त करण्याकडे मनपा नगरसेवकांचे दुर्लक्ष आहे. यामुळे नागरीकांना असुविधांचा सामना करावा लागतो आहे. अनधिकृत बांधकामांचा मात्र येथल्या बंदरपाड्यात कळस गाठलेला आहे. संपूर्ण बंदपाडाच अनधिकृत वसलेला आहे. चाळमाफिया आणि भूमाफियांनी सरकारी जागेवरच हा बंदपाडा वसवलेला आहे. मनपाचे अनधिकृत बांधकाम उपायुक्त अ प्रभागक्षेत्र अधिकारी आणि नगरसेवकाचे वरदहस्त असल्यानेच अनधिकृत बांधकामांना बंदरपाड्यात उधाण आलेले आहे. प्रभाग १२ चे नगरसेवक सांगतात बंदरपाडा प्रभाग ११ मध्ये येतो. पण सुविधा मी पुरवितो. पण अनधिकृत बांधकामांबद्दल मात्र हात वर करतात. मग ही जबाबदारी कोणाची? हा प्रश्न कायम आहे. यात आर्थिक हित दडल्याचे नागरिक सांगत आहेत. उल्हासनगरमधून वाहणारा नाला शहाडच्या अंबिका नगरजवळील उड्डाणपूला खालून वाहतो. येथील मोरीजवळ हा नाला अगदीच अरुंद आहे. यामुळे पावसाळ्यात तुंबतो व कल्याण मोहने आणि शहाड रस्ता बंद होतो. या नाल्यावरूनच मनपाने जलवाहिनी नेली आहे. परिणामी मोरीची उंची वाढविण्यास अडचण आहे. अधिकाऱ्यांच्या नियोजनाचा अभाव येथे उघड होतो. ही स्थिती बदलणार कधी हाच रहिवाशांचा सवाल आहे.जेएनएनयुएम योजनेचा लाभ या प्रभागाला मिळाला नसल्याने भुमीगत गटारी झाल्या नाहीत. कल्याण डोंबिवलीतच सगळा निधी जातो. आम्हाला निधीची कमतरता असल्याने प्रभागात नागरी सुविधांच्या योजना राबवल्या गेल्या नाहीत. नाल्याबाबत मनपा अधिकाऱ्यांनी नियोजन करायला हवे.- महेंद्र गायकवाड, नगरसेवक, गालेगाव कडोंमपा
समस्यांच्या चक्रव्यूहात शहाड
By admin | Updated: June 19, 2015 00:15 IST