लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर गुलाब नावाच्या चक्रीवादळात झाले असून, या चक्रीवादळाचा फटका प्रामुख्याने ओडिशा आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांना बसत आहे, तर चक्रीवादळाचा प्रभाव मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यांवरही पडणार असून, २७ आणि २८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २७ आणि २८ सप्टेंबर रोजी विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाची तीव्रता अधिक असेल. उद्या चंद्रपूर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, नाशिक, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मंगळवारी पालघर, ठाणे, रायगड, धुळे, जळगाव या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर मुंबई, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार आणि औरंगाबाद या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यातही पावसाचा जोर बऱ्यापैकी राहणार आहे.
----------------
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडेल. वाऱ्याचा वेग जास्त असेल. याचा प्रभाव महाराष्ट्रावरही जाणवणार आहे. २७ सप्टेंबर रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात, तर २८ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
- शुभांगी भुते, शास्त्रज्ञ, मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग