Join us  

सुकरवाडीपेक्षा नॅन्सी कॉलनीच्या आगारात वाढत्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:44 AM

सुकरवाडी एसटी स्थानकावर प्रवाशांसाठी आसनाची उत्तम सोय आहे.

- सागर नेवरेकर 

मुंबई : सुकरवाडी आगार आणि नॅन्सी आगार असे दोन एसटी आगार बोरीवलीत आहेत. सुकरवाडी एसटी आगाराची स्थिती तशी बऱ्यापैकी स्थिर आहे. नॅन्सी कॉलनी येथील एसटी आगारामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. अस्वच्छ शौचालय, पाण्याच्या ठिकाणी अस्वच्छता आणि इतर वाहनांची आगारात पार्किंग इत्यादी समस्यांना प्रवाशांना सामोरे जावे लागते.

सुकरवाडी एसटी स्थानकावर प्रवाशांसाठी आसनाची उत्तम सोय आहे. एकच तिकीट घर असल्यामुळे गर्दीच्या हंगामामध्ये प्रवाशांची मोठी रांग लागलेली असते. तिकीट घराशेजारी पासाची खिडकी आहे़ तेथे कोणताही कर्मचारी बसलेला दिसून आला नाही. एसटी स्थानकाच्या आवारात एक प्याऊ असून प्रवाशांना मोफत पाणी पुरविले जाते. आगारात चौकशी केंद्र आहे. आगारामध्ये बरेच रिकामे स्टॉल धूळ खात पडलेले आहेत़ त्याचा वापर का केला जात नाही, असा सवाल प्रवाशांनी केला आहे. शौचालयाची उत्तम व्यवस्था आगारात दिसून आली. सुकरवाडी एसटी आगारातील दूरध्वनी बंद पडला आहे. बिल वेळेवर भरलेले नसल्यामुळे दूरध्वनी बंद पडल्याचे एसटी आगारातील कर्मचाºयाने सांगितले.

नॅन्सी कॉलनीमध्ये एसटी आगारात प्रवाशांना बसण्यासाठी कमी आसनाची व्यवस्था आहे. शौचालय छोटे आहे़ तेथे अस्वच्छता पसलेली आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. पाणी पिण्याजोगे नाही, अशीच काहीशी भावना प्रवाशांच्या मनात येते. एसटी आगारात रिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहने सर्रासपणे पार्किंग केल्या जातात. एसटीला आगाराबाहेर काढताना चालकाला नाहक त्रास सहन करावा लागतो. आगारामध्ये एक आरक्षण कक्ष आणि तिकीट घर आहे. वाहनचालक आणि कंडक्टर यांना विश्रांतीसाठी खोली नाही.बरेचसे वाहनचालक एसटीमध्येच आराम करताना निदर्शनास आले. धुळीचे मोठे साम्राज्य आगारामध्ये पसरलेले असते. आगाराच्या परिसरात सीताराम टी स्टॉल असून त्याच्याकडून वाहनचालक आणि कंडक्टर पिण्याच्या पाण्याची बॉटल विकत घेतात अथवा स्वत:कडील पाण्याची बॉटल भरून घेतात़

वाहन व चालकांची अशी दुरवस्था असल्याने प्रवाशांची अवस्था किती दयनीय होत असेल याचा अंदाज येतो़ मुळात एसटी प्रवाशांना दर्जेदार सुविधा देणे हे प्रशासनाचे काम आहे़ मात्र इतर आगारांप्रमाणे या आगाराकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष आहे़ त्याचा नाहक फटका प्रवाशांना बसत आहे़ येथे दर्जेदार व अद्ययावत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे़