बोर्लीपंचतन: बोर्लीपंचतन परिसराला वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले असून त्यामध्ये शिस्ते गावाला याचा तडाखा बसला आहे. येथील बारा घरांच्या छपराचे व भिंतीचे एकूण लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.गेली पाच दिवस पडणाऱ्या वादळी पावसामुळे बोर्लीपंचतन विभागातील वीजपुरवठाही चार दिवसापासून खंडित असल्याने बँका, विद्यालये, शासकीय कामकाज ठप्प आहे. गेली चार दिवस व रात्र अंधारात जात असल्याने वडवली व कुडकी गावांतील जनतेने अखेरीस गोंडघर येथील वीज कार्यालयावर धडक देत हल्लाबोल केला. यामुळे काही गावातील वीजपुरवठा रात्री उशिराने सुरू झाला असता तरी तोही वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. गेली पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाने बोर्लीपंचतन परिसरात चांगलाच धुमाकूळ घातल्याने त्याचा फटकाही शिस्ते गावाला चांगलाच बसला असून येथील बारा घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून याबाबतचा पंचनामा बोर्लीपंचतन तलाठी सजा प्रभारी तलाठी जी. पी. दिघीकर यांनी सरपंच रमेश घरत यांच्या उपस्थितीत केला तर मंडळ अधिकारी लिमजे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. शिस्ते गावातील नुकसान झालेल्या बारा घरांचे छप्पर व भिंतीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून सुमारे एक लाखाचे नुकसान पंचनाम्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. पावसाने विद्युत मंडळाचीही चांगली दमछाक केली आहे. पावसाने विद्युुत गेली चार दिवस बोर्ली पंचतन, दिवे आगर, शिस्ते, कापोली, कुडकी, वेळास, आदगाव, सर्व, गोंडघर, कोंढेपंचतन आदी गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात अडचणी येत आहे. (वार्ताहर)
पावसाने बारा घरांचे नुकसान
By admin | Updated: June 23, 2015 00:32 IST