तलाव भरले...पण नळाला पाणी नाही; पाणीप्रश्न सोडविण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 12:31 AM2019-11-02T00:31:37+5:302019-11-02T00:32:00+5:30

गेल्या वर्षी अपुऱ्या पावसामुळे पालिका प्रशासनाने १५ नोव्हेंबर, २०१८ पासून सरसकट दहा टक्के पाणी कपात लागू केली होती.

The pond is full ... but the tap has no water; Demand to solve water problems | तलाव भरले...पण नळाला पाणी नाही; पाणीप्रश्न सोडविण्याची मागणी

तलाव भरले...पण नळाला पाणी नाही; पाणीप्रश्न सोडविण्याची मागणी

Next

मुंबई : मुसळधार पावसाने या वर्षी तलावांमध्ये मुबलक जलसाठा जमा झाला आहे, तरीही अनेक विभागांमध्ये अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारी कायम आहेत. तलावात पाणी असताना अनेक ठिकाणी कमी दाबाने पुरवठा होत आहे. मग हे पाणी जातं कुठे? असा संतप्त सवाल सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने प्रशासनाने तत्काळ पाणीप्रश्न सोडवावा, अशी जोरदार मागणी नगरसेवकांनी केली.

गेल्या वर्षी अपुऱ्या पावसामुळे पालिका प्रशासनाने १५ नोव्हेंबर, २०१८ पासून सरसकट दहा टक्के पाणी कपात लागू केली होती. ही कपात आठ महिने सुरू राहिली. या वर्षी जोरदार पाऊस होऊन सर्व तलाव तुडुंब भरली आहेत. पुढच्या पावसाळ्यापर्यंत पाणीपुरवठा होऊ शकेल, इतका जलसाठा तलावांमध्ये आहे. तरीही मुंबईतील अनेक विभागांतील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा
लागत आहे. याचे पडसाद शुक्रवारी स्थायी समितीत उमटले. शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी याबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

तलावे भरली व वर्षभर पाणी पुरेल इतका पाणीसाठा असतानाही पाणीटंचाई कशी? असा सवाल करीत नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डातील तक्रारी केल्या. पाणीसमस्येबाबत रहिवाशांच्या तक्रारीकडे अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जाते. तलावात पुरेसा पाणी असूनही पाणीटंचाईचे नेमके कारण काय, याचा प्रशासनाने खुलासा करण्याची मागणी शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर, रमेश कोरगावकर, राजुल पटेल, विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव आदी नगरसेवकांनी केली. प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही़ नगरसेवकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

स्थायी समिती अध्यक्षांचा पाणी दौरा
पालिका प्रशासन या टंचाई मागचे ठोस कारण सांगत नसल्याने स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आता स्वत: पाहणी दौरा करणार आहेत.

या ठिकाणी पाणीटंचाई
कुलाबा, घाटकोपर, भांडुप, वर्सोवा, परळ, कुर्ला आदी ठिकाणी पाणीसमस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.

मुंबईला दररोज होणारा पाणीपुरवठा - दररोज ३,७५० दशलक्ष लीटर
पाणीचोरी व गळती - प्रतिदिन नऊशे दशलक्ष लीटर
पाण्याची मागणी - दररोज ४,५०० दशलक्ष लीटर

Web Title: The pond is full ... but the tap has no water; Demand to solve water problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.