Join us  

सहा महिन्यांत प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 12:27 AM

सहा महिन्यांत प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी आणून पर्यायी व्यवस्था करणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय हरित लवाद व पर्यावरण विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय पर्यावरण परिषदेत केली.

मुंबई : सहा महिन्यांत प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी आणून पर्यायी व्यवस्था करणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय हरित लवाद व पर्यावरण विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय पर्यावरण परिषदेत केली.पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी हा विषय उपस्थित केला होता. कदम म्हणाले, मुंबईतील हवेत असलेले कार्बनडाय आॅक्साइड कमी करण्यासाठी विविध उपाय केले आहेत. पर्यावरणाचे संतुलन कायम राहावे, म्हणून लाखो झाडे लावण्याची मोहीम सरकारने पार पाडली आहे. प्लॅस्टिक कॅरिबॅग बंदीसाठी पर्यावरण विभाग वेगाने काम करीत आहे.तोच धागा पकडून मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.व्यासपीठावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डॉ. डी. वाय. चंद्रचूड, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीचा आधार घेत, मुख्यमंत्र्यांनी मुंबई मेट्रोवरून सरकार आणि न्यायालयाच्या तणावावर भाष्य केले. फडणवीस म्हणाले, मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू आहे, परंतु काही नागरिकांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याने काम रखडत आहे.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डॉ. डी. वाय. चंद्रचूड म्हणाले, प्रदूषण हटाव मोहिमेकडे एक सामाजिक चळवळ म्हणून पाहिले पाहिजे. शहरातील कचरा उचलण्याचे नियोजन हवे. प्लॅस्टिकच्या वस्तू, कॅरिबॅग वापरण्यावर बंदी पाहिजे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर म्हणाल्या, एकीकडे विकासाच्या मागे लागत असताना, पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्सुनामी, ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण मानवाला घातक आहे. ग्लोबल वॉर्मिंग, प्लॅस्टिक वापराचा धोका आहे. प्रदूषणाच्या बाबतीत प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे आहे. प्रदूषणाच्या तक्रारी थेट प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडे केल्या पाहिजेत.राष्ट्रीय हरित लवादाचे चेअरमन न्या. स्वतंत्रकुमार यांनी प्रास्ताविक केले. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई उपस्थित होते. मुख्य सचिव सुमित मल्लिक यांचेही भाषण झाले. गुजरात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष अरविंद अग्रवाल यांनी आभार मानले.जनतेने विकासाला साथ दिली पाहिजेमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई मेट्रोवरून सरकार आणि न्यायालयाच्या तणावावर भाष्य केले. मेट्रोचे काम दिवसा करावे, रात्री करू नये, धुळीचा त्रास होतो.इमारतींना तडे जातात, असे काही मुद्दे आहेत. जनतेने विकासाला साथ दिली पाहिजे. मेट्रोमुळे दळणवळणाला गती येणार आहे. काम रखडले, तर कोट्यवधींचे नुकसान होते.

टॅग्स :देवेंद्र फडणवीस