Join us  

‘त्या’ विमानाकडे उड्डाणाचे प्रमाणपत्रच नव्हते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 6:33 AM

घाटकोपरला दाट लोकवस्तीत कोसळलेल्या खाजगी विमानाला उड्डाणासाठी आवश्यक असलेले एअरवदीर्नेस प्रमाणपत्र मिळाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली

मुंंबई : घाटकोपरला दाट लोकवस्तीत कोसळलेल्या खाजगी विमानाला उड्डाणासाठी आवश्यक असलेले एअरवदीर्नेस प्रमाणपत्र मिळाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या डीएनए चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यांच्या अंगावरील वस्तू आणि शरीराच्या ठेवणीवरून नातलगांनी ते ताब्यात घेतले. या अपघाताच्या चौकशीचे डीजीसीआयचे काम सुरू झाले असले, तरी त्यांनी दुर्घटना नेमकी कशामुळे घडली त्याबाबत अद्याप कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.दरम्यान, विमान पडलेले घाटकोपरमधील ठिकाण पाहण्यासाठी शुक्रवारी नागरिकांची एवढी गर्दी झाली, की अखेर पोलिसांनी रांग लावून तेथे सोडण्यास सुरूवात केली. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातही याच यूवी कंपनीचे विमान असल्याचा मुद्दाही दिवसभर चर्चेत होता.यूवाय कंपनीच्या मालकीचे हे विमान गुरूवारी घाटकोपरच्या जीवदया लेनमधील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ठिकाणी कोसळून विमानातील चार आणि एका पादचाऱ्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. विमानाची उड्डाण चाचणी घेताना ते कोसळून ही दुर्घटना घडली होती.उत्तर प्रदेश सरकारच्या ताफ्यात असताना या विमानातून अनेक राजकीय महत्त्वाच्या नेत्यांनी उड्डाण केले होते. उत्तर प्रदेश सरकारने हे विमान १९९२ मध्ये खरेदी केले होते. त्यानंतर २००९ पर्यंत हे विमान त्यांच्या मालकीचे होते. अलाहाबाद येथील एका अपघातात विमानाचा पुढील भाग निकामी झाल्यानंतर तब्बल नऊ वर्षे ते जमिनीवरच होते. अलाहाबादच्या अपघातात वैमानिकाची चूक असल्याचा निष्कर्ष डीजीसीएने काढला होता. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने हे विमान विकण्याचा निर्णय घेतला. लखनऊ विमानतळाच्या हँंगरमध्ये हे विमान ठेवण्यात आले होते. २०१४मध्ये तिसऱ्या लिलावात हे विमान पुण्यातील कंपनीने तीन कोटी रुपयांना विकत घेतले. त्यानंतर त्या विमानाचे पार्ट वेगवेगळे करून ते विमान मुंबईत आणण्यात आले. ते यूवाय एव्हिएशन कंपनीने विकत घेतले आणि त्याची दुरुस्ती सुरू केली.या विमानाच्या इन्स्ट्र्ुमेंट लँडिंग सिस्टिमची चाचणी घेण्यासाठी ते मुंबई विमानतळावर उतरण्याची परवानगी घेण्यात आली होती. त्यासाठी हे विमान जुहूऐवजी मुंबई विमानतळाकडे जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.मारिया यांच्या पतीचे आरोप फेटाळलेसहवैमानिक मारिया झुबेर यांच्या पतीने गुरुवारी खराब हवामानात उड्डाण करायला लावल्याबद्दल यूवाय कंपनीवर आरोप केले होते. मात्र, अशी कोणतीही परिस्थिती नसून मारिया यांनी त्याबाबत कंपनीला काहीही सांगितले नव्हते. त्यांच्या पतीचे आरोप चुकीचे असल्याचा दावा कंपनीने केला. विमानाचे मुख्य वैमानिक असलेले कॅप्टन प्रदीप राजपूत यांना तब्बल पाच हजार तासांचा विमान उड्डाणाचा अनुभव होता. या विमानाच्या उड्डाणाच्या चाचणीसाठी ते दिल्लीहून गुरुवारी सकाळीच मुंबईला आले होते. गेल्या २० वर्षांपासून वैमानिक असलेल्या राजपूत यांचीही खराब वातावरणात विमानाच्या उड्डाणाची चाचणी घेण्याची मानसिकता नव्हती, असा दावा त्यांच्या नातेवाइकांनी केला होता. पण त्या मुद्द्याची अधिकृत नोंद नसल्याचा दावा कंपनीने केला.

‘पूर्ण मालकी आमची नव्हे’विमानाचे मालकी हक्क जरी आमच्याकडे असले, तरीही इन्डॅमर कंपनी विमानाची देखरेख करत होती. त्या कंपनीकडून विमान आमच्याकडे पूर्णत: सोपवलेले नव्हते, असा मुद्दा यूवाय एव्हिएशनचे व्यवस्थापक अनील चौहान यांनी काही वृत्तसंस्थांशी बोलताना मांडला. या विमानाला उड्डाणयोग्यतेचे प्रमाणपत्र म्हणजे एअरवर्दिनेस सर्टिर्फिकेट मिळालेले नव्हते, हेही त्यांनी मान्य केले.तो आनंद क्षणभंगूर ठरला!विमान दुघर्टनेत जीव गमावलेल्या सहवैमानिक मारिया झुबेर यांच्या मुलीला बुधवारी मुंबईतील एका क्वीझ स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले होते. याचा यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मारिया यांनी त्यांच्या अलाहाबादमध्ये राहणाऱ्या पालकांना तत्काळ ते कळवले होते. मात्र, गुरूवारच्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.जुहू येथून विमानाने उड्डाण केल्यानंतर ते काही मिनिटांत कोसळल्याची प्राथमिक माहिती गुरूवारी देण्यात आली होती. परंतु दीडशे किमीचा हवाई प्रवास या विमानाने केला आणि मुंबई विमानतळापासून जुहू धावपट्टीवर उतरण्यासाठी विमानाने उजव्या बाजूला वळण घेतले होते.ही माहिती हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला (एटीसी) रडारच्या माध्यमातून कळाली, त्यावेळी विमान सुमारे सातशे फूट उंचीवर होते. पण वैमानिकाशी संपर्क होऊ न शकला नाही. यानंतर काही क्षणातच विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

टॅग्स :मुंबई विमान दुर्घटना