Join us  

पावसामुळे तिसऱ्या यादीतील अकरावी प्रवेशांसाठी एक दिवसाची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 7:37 PM

शालेय शिक्षण, क्रिडा युवक कल्याण मंत्री अँड. आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे परिसरात काल रात्री पासूनच पावसाचा जोर पाहता अकरावीच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीतील प्रवेश प्रक्रियेची मुदत एक दिवसाने वाढवून देण्याचा निर्णय शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केला. 

आता ही प्रवेशप्रक्रिया ५ ऑगस्टऐवजी ६ ऑगस्ट संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरु असणार आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी घाई करुन पावसात बाहेर पडू नये, असे आवाहन ही शिक्षण मंत्र्यांनी केले आहे. सकाळी पावसाचा जोर पाहून तातडीने शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ट्विट करून ही मुदतवाढ जाहीर केली. सोबतच अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावरही यासंदर्भातील सूचना ही देण्यात आल्या आहेत.

१ ऑगस्ट रोजी अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली असून संबंधित महाविद्यालयांत जाऊन प्रवेश घेण्याची मुदत ही ५ ऑगस्ट दुपारी ३ वाजेपर्यंत फी आणि कागदपत्रे सादर करावी लागणार होती. त्यातपावसाने एक दिवस वाया जाऊ नये म्हणून पालक घाई करण्याची शक्यता होती. सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरांत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक विद्यार्थी आणि पालकांना प्रवेश घेण्यासाठी महाविद्यालयांत पोहचणे अशक्य झाले. या पार्श्ववभूमीवर प्रवेशासाठी जोखीम घेण्याची वेळ येऊ नये यासाठी शिक्षण विभागाला वेळापत्रकात बदल करण्याचे निर्देश देऊन शिक्षणमंत्र्यांनी ही मुदत एका दिवसाने वाढविण्याचा निर्णय जाहीर केला.