Join us  

कोविड निर्बंधांच्या अंमलबजावणीवेळी कुठलाही अतिरेक, विसंगत कृती नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 4:07 AM

- गृहमंत्री वळसे-पाटील यांचा पोलिसांना इशारालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कडक ...

- गृहमंत्री वळसे-पाटील यांचा पोलिसांना इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करताना मुख्य उद्देश कोविडची संसर्ग साखळी तोडणे हा आहे. त्यामुळे कुठलाही अतिरेक किंवा विसंगत कृती होऊ नये, याची पोलिसांनी खबरदारी घ्यावी, असा इशारा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला.

लॉकडाऊनच्या अनुषंगाने राज्यातील सद्य:स्थितीचा आढावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आगामी सण, उत्सवाच्या काळात समाजमाध्यमांवर अधिक करडी नजर ठेवावी. आक्षेपार्ह पोस्ट आणि अफवा पसरणार नाहीत, याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले.

बैठकीला गृहविभागाचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदी उपस्थित होते.

वळसे-पाटील म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस विभाग सातत्याने कार्यरत आहे. या काळातील बंदोबस्ताचे नियोजन, पोलीस कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा तसेच अडचणींची तातडीने निर्गत होणे आवश्यक आहे. राज्यात कडक निर्बंध लावले आहेत त्याचा मुख्य उद्देश हा कोविडची संसर्ग साखळी तोडणे हा आहे हे लक्षात ठेवावे आणि कुठलाही अतिरेक किंवा विसंगत कृती करू नये. पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी तसेच सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. पोलीस कर्तव्य बजावत असताना त्यांना जनमानसात फिरावे लागते, यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त आहे हे लक्षात घेऊन त्यांच्या आरोग्याबाबतही दक्षता घ्यावी. संसर्ग झाल्यास तत्काळ उपचारासाठी रुग्णालय व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. पोलीस दलातील प्रत्येकाचे तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे लसीकरण करून घ्यावे. त्यासाठी आवश्यक त्या सोयी सवलती उपलब्ध करून द्याव्यात, आगामी काळातील सण, उत्सव शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडावेत यासाठी विविध घटकांशी सुसंवाद वाढवावा, लोकांमध्ये सुरक्षेच्या उपायांबाबत विश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न करावेत, नियमांची अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा, असेही ते म्हणाले. पोलीस आणि सामान्य जनता यांच्यात समन्वयाचे नाते निर्माण करण्याच्या सूचना करत जनतेला आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.