सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईआगीच्या घटनांमध्ये जळून जखमी झालेल्यांवर त्वचाप्रत्यारोपण केले जाते. मात्र मुंबई विभागाला दरमहा सुमारे १५० त्वचांची गरज असताना केवळ २५ ते ३० त्वचा उपलब्ध होत आहेत. त्वचादानाचे प्रमाण कमी असल्याने हा तुटवडा जाणवत आहे.मुंबईसह नवी मुंबई व ठाणे परिसरात सातत्याने आग लागते. यातील जखमींना नवजीवन मिळावे याकरिता त्यांच्यावर त्वचाप्रत्यारोपण केले जाते. मात्र त्वचेच्या तुटवड्यामुळे अनेकांच्या उपचारांत विघ्न येत आहेत. जखमीच्या शरीरावरील जळालेली त्वचा काढून त्या ठिकाणी हे त्वचाप्रत्यारोपण केले जाते. शरीरावर नवी त्वचा निर्माण होण्यासाठी त्याचा मुख्य आधार ठरतो. त्यानंतर लावलेल्या त्वचेचा पापुद्रा काढला जातो. त्यामुळे जळालेल्या व्यक्तीच्या शरीरावर नवी त्वचा येऊन त्याला नवजीवन मिळते. सध्या मुंबईत लागणाऱ्या आगींमुळे दरमहा १५० व्यक्तींना त्वचेची गरज भासते आहे. मात्र प्रत्यक्षात २५ ते ३० व्यक्तींची त्वचाच त्वचापेढीकडे उपलब्ध होत आहे. त्वचादानाचे प्रमाण कमी असल्याने त्वचेचा हा तुटवडा भासत आहे. परिणामी उपचारात होणाऱ्या विलंबामुळे अनेक जखमींचे प्राणही जात आहेत. महाराष्ट्रात अगदी मोजक्याच त्वचापेढी असून त्यामध्ये नवी मुंबईच्या नॅशनल बर्न सेंटर रुग्णालयासह पुणे व नागपूर येथील पेढींचा समावेश आहे. तर राज्याबाहेर इंदोर, बेंगलोर, ओडीसा येथे इच्छुकांची त्वचा घेऊन ती साठवली जाते.मात्र याबाबत अद्यापही समाजात पुरेशी जनजागृती झालेली नाही. त्यामुळे आकस्मित अथवा अपघाती निधन होणाऱ्यांची संख्या मोठी असतानाही त्वचादान मात्र महिन्याला अवघे २५ ते ३० जणांकडूनच होत आहे. सरकारही उदासीन आहे. रक्तदान व नेत्रदानासाठी सर्वत्र जनजागृती होत असताना तितक्याच महत्त्वाच्या त्वचादानाच्याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याची खंतही रुग्णांच्या नातेवाइकांकडून व्यक्त होत आहे.
मुंबई विभागात दरमहा १५० त्वचांची गरज
By admin | Updated: May 15, 2015 23:31 IST