Join us  

कर्जत ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा वरचष्मा

By admin | Published: November 24, 2014 10:55 PM

रविवारी झालेल्या पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला वरचष्मा कायम ठेवला आहे.

कर्जत : रविवारी झालेल्या पाच ग्रामपंचायतींच्या  निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला वरचष्मा कायम ठेवला आहे. नेरळ, वाकस, वरईतर्फे नीड, तिवरे या ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकल्या आहेत, तर उमरोली ग्रामपंचायत शिवसेनेने जिंकली आहे. तिवरे ग्रामपंचायतमधील एका जागेवर दोन्ही महिला उमेदवारांना  समान मते मिळाल्यामुळे तेथे चिठ्ठी काढून विजयी उमेदवार ठरविण्यात आला. एकंदरीत या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने वरचष्मा ठेवला आहे.
कर्जत तालुक्यातील पाच ग्रामपंचायत निवडणुकांसाठी  रविवारी मतदान घेण्यात आले होते. निवडणूक  झालेल्या जागांची  मतमोजणी आज तहसीलदार रवींद्र बाविस्कर, निवासी नायब तहसीलदार एल. के. खटके, नायब तहसीलदार अर्चना प्रधान, नालंद गांगुर्डे, डी. एल. मोडक तसेच निवडणूक विभागाचे किरण पाटील, कृष्णा पालवे यांच्या उपस्थितीत झाली. रायगड जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या असलेल्या नेरळ  ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत  आज राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली. 17 जागांसाठी रविवारी मतदान झाले. तेथे राष्ट्रवादी कॉंग्रेस - शेकाप - स्वाभिमान रिपब्लिकन आघाडीचे 11  उमेदवार विजयी झाले. तेथे मनसे - रिपाइं आघाडीचे तीन तर शिवशाही आघाडीच्या दोन आणि शिवसेनेचा एक उमेदवार विजयी झाला आहे. राष्ट्रवादी युवकचे नेरळ शहर माजी  अध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी सर्वाधिक 1144 अधिक मते मिळवून 859  मतांनी विजयी झाले आहेत. 
प्रभाग - 1 मधून राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सदानंद पांडू शिंगवा, अश्विनी सुनील  पारधी, संजीवनी संजय हजारे हे विजयी झाले. प्रभाग दोनमधून मंगेश राजाराम म्हसकर आणि मीना विजय पवार हे राष्ट्रवादी - शेकाप आघाडीचे उमेदवार विजयी झाले. प्रभाग तीनमधून मनसे-रिपाइं आघाडीचे अंकुश गणपत शेळके, सुवर्णा राजू मरे, अनिता उपेंद्र भालेराव हे विजयी झाले. प्रभाग चार मधून राष्ट्रवादी आघाडीचे सन्नी सुनील चंचे, राजेश मिरकुटे हे विजयी झाले. प्रभाग पाचमधून राष्ट्रवादी - शेकाप आघाडीकडून सुवर्णा सुधाकर नाईक, कौसर तहसीन सहेद आणि नितेश महेंद्रकुमार शाह हे विजयी झाले. 
प्रभाग सहामधून शिवसेना- भाजपा युतीचे प्रथमेश रोहिदास मोरे,शिवशाही आघाडीचे केतन पोतदार आणि  जान्हवी साळुंखे हे विजयी झाले. शिवसेनेचे अनेक प्रमुख उमेदवार पराभूत झाले.
 
च्तिवरे ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग एकमधून नितीन शिवराम दगडे हे निवडून आले तर तेथे चित्ना जगदीश ठाकरे आणि जना मुकुंद वाघमारे बिनविरोध निवडून आले .प्रभाग दोनमध्ये संतोष रघुनाथ भासे,बारकी पांडू वाघमारे हे विजयी झाले तर तेथील अनुसूचित जाती महिला राखीव जागेवर उभ्या असलेल्या शीतल जग्गनाथ गायकवाड आणि सुनीता संतोष जाधव यांना समसमान177  मते मिळाली.त्यामुळे तेथील उमेदवार विजयी घोषित करण्यासाठी चिठ्ठी काढण्यात आली. त्यात सुनीता संतोष जाधव यांना नशिबाने साथ दिली आणि विजयी झाल्या. वरई तर्फे निड ग्रामपंचायतीमध्ये नऊपैकी सहा जागा बिनविरोध आल्या होत्या, तेथे प्रभाग एकमध्ये दिलीप विजय लोट, सुजाता शिवनाथ भुसारी आणि शारदा भालचंद्र घोडविंदे हे उमेदवार विजयी झाले.