Join us

मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 05:47 IST

Mumbai News: प्रमुख भारतीय शहरांमध्ये इमारती कोसळण्यामागे अनेकदा खराब बांधकाम आणि बेकायदेशीर केलेले अंतर्गत बदल ही कारणे सांगितली जातात. मात्र, भारतातील प्रमुख महानगरे दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि बंगळुरू यांच्या जमिनी हळूहळू खचत चालल्यानेही असे प्रकार घडत असल्याचे आंतरराष्ट्रीय अहवालात म्हटले आहे. 

नवी दिल्ली - प्रमुख भारतीय शहरांमध्ये इमारती कोसळण्यामागे अनेकदा खराब बांधकाम आणि बेकायदेशीर केलेले अंतर्गत बदल ही कारणे सांगितली जातात. मात्र, भारतातील प्रमुख महानगरे दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि बंगळुरू यांच्या जमिनी हळूहळू खचत चालल्यानेही असे प्रकार घडत असल्याचे आंतरराष्ट्रीय अहवालात म्हटले आहे. 

‘नेचर सस्टेनेबिलिटी’ या आंतरराष्ट्रीय विज्ञान नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, या शहरांतील सुमारे ८७८ चौ.कि.मी. क्षेत्रफळाची जमीन सतत खचत आहे. २०१५ ते २०२३ दरम्यान युरोपियन उपग्रह ‘सेंटिनेल-१’ कडून मिळालेल्या रडार आकडेवारीवरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या अभ्यासानुसार, या शहरांतील अनेक भाग इतक्या वेगाने खचत आहेत की त्यामुळे इमारती, रस्ते आणि जलवाहिन्या यांना गंभीर धोका निर्माण झाला आहे.

दिल्लीतील जमिनीत सर्वाधिक हालचाल दिसून आली असून, तेथील जमीन दरवर्षी ५१ मिलीमीटरपर्यंत खचत आहे. त्यानंतर चेन्नई (३१.७ मिमी.), मुंबई (२६.१ मिमी.), कोलकाता (१६.४ मिमी.) आणि बंगळुरू (६.७ मिमी.) या शहरांचा क्रम लागतो. या शहरांतील सुमारे १९ लाख लोक अशा भागांत राहतात जिथे जमीन दरवर्षी ४ मिमी.हून अधिक वेगाने खचत आहे. ही प्रक्रिया डोळ्यांना दिसत नाही, पण इमारतींची पायाभरणी झुकते किंवा त्यात भेगा पडतात.

भूजलाचा अतिवापर हेच मुख्य कारण वैज्ञानिकांच्या मते, जमीन खचण्यामागील प्रमुख कारण म्हणजे भूजलाचा अमर्याद उपसा. जमिनीखालून पाणी वेगाने काढले गेले की वरच्या मातीच्या थरांमध्ये कोरडेपणा निर्माण होते आणि ते थर हळूहळू आकुंचन पावतात. २००२ ते २०२३ दरम्यान सर्व महानगरांतील भूजल साठ्यात घट झाल्याचे उपग्रह आकडे सांगतात. वाढता शहरी ताण, अस्थिर जलव्यवस्थापन, अनियमित पावसाचे चक्र आणि काँक्रीटने झाकलेले विस्तीर्ण क्षेत्र या संकटाला अधिक गडद करत आहेत.

शहरांनुसार परिस्थितीदिल्ली-एनसीआरमध्ये, बिजवासन, फरिदाबाद आणि गाझियाबाद सर्वाधिक प्रभावित झाले. दरवर्षी ३८-५१ मिमीपर्यंत भूगर्भातील पाण्याचा उपसा झाला. भूजल उपसा आणि मऊ माती ही मुख्य कारणे आहेत.चेन्नईच्या अड्यार आणि तोंडियारपेट भागात भूजल उपशामुळे जमीन खचत आहे.कोलकातामध्ये, हावडा, टॉलीगंज आणि विधाननगरमध्ये मातीच्या आकुंचनामुळे जमीन खचते आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai, Delhi, Chennai sinking; Scientists warn millions at risk.

Web Summary : Major Indian cities are sinking, risking infrastructure. Delhi faces the fastest subsidence at 51mm/year, followed by Chennai, Mumbai, Kolkata and Bangalore. Nearly 1.9 million residents live in areas subsiding rapidly, leading to building damage, according to an international report.
टॅग्स :मुंबईपृथ्वी