Join us  

मुंबईकरांना गॅस्ट्रोची लागण! उघड्यावरील खाद्यपदार्थ, दूषित पाण्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 2:21 AM

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या डेंग्यू, मलेरियाबरोबरच मुंबईकरांना गॅस्ट्रोचीही लागण झाली आहे. उघड्यावरील पदार्थ, गढूळ पाणी यामुळे गॅस्टो बळावल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या डेंग्यू, मलेरियाबरोबरच मुंबईकरांना गॅस्ट्रोचीही लागण झाली आहे. उघड्यावरील पदार्थ, गढूळ पाणी यामुळे गॅस्टो बळावल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जुलै २०१८ मध्ये गॅस्ट्रोचे १,०८९ इतके रुग्ण आढळले.गेल्या वर्षी जुलै महिन्यात गॅस्ट्रोच्या १,०१० रुग्णांची नोंद झाली होती. रस्त्यांवरील खाद्यपदार्थ आणि सरबतांसाठी वापरले जाणारे दूषित पाणी आणि बर्फामुळे गॅस्ट्रो बळावत असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.रोटा, अ‍ॅडेनो किंवा अ‍ॅस्ट्रोसारख्या विषाणूंचा, तसेच सॅल्मोनेला, शिंगेला, स्टॅफीलोकोकस, कॅम्पिलोबॅक्टर आदी जीवाणूंचा संसर्ग, उघड्यावरील आहार किंवा औषधाचा प्रतिकूल परिणाम, यामुळे गॅॅस्ट्रोची लागण होते. गॅस्ट्रोच्या रुग्णांत आतड्यांना सूज येऊन जुलाब, उलट्या होणे अशी लक्षणे दिसून येत असल्याची माहिती साथ रोग कक्ष नियंत्रण प्रमुख डॉ. मिनी खेत्रपाल यांनी ‘लोकमत’ला दिली. पावसाळ्यात उघड्यावरील अन्नपदार्थ, सरबत याऐवजी घरचे ताजे अन्न खावे, तसेच पाणीसुद्धा उकळून प्यायला हवे. लहान मुलांच्या पोटातील दुखण्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे डॉ. खेत्रपाल यांनी सांगितले.गॅस्ट्रोची लक्षणेतोंड कोरडे पडणे, वजन कमी होणे.पोट दुखणे आणि वारंवार पातळ शौचास होणे.उलटी होणे, लहान मुलांची टाळू खोल जाणे, डोळे खोल जाणे.लघवी कमी होणे किंवा लघवीचा रंग बदलणे.उपाययोजना- पाणी उकळून आणि गाळून पिणे.- घराच्या परिसरात स्वच्छता राखणे.- शौचाला जाऊन आल्यानंतर हात साबणाने धुणे.- घरगुती उपाय मीठ-साखरेचे पाणी रुग्णास देणे.- रुग्णाच्या आहारात सफरचंद, मऊ शिजलेला भात, दही यांचा समावेश करणे.- ७२ तासांच्या आत त्रास न थांबल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाणे.डेंग्यू, कावीळ, मलेरियाचाही तापजुलै २०१८ मध्ये डेंग्यूच्या ६० रुग्णांची, मलेरियाच्या ६३४ आणि काविळीच्या १०४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, तर कॉलराचे ६ रुग्ण आढळून आले आहेत. ई वॉर्डमधून ३ आणि बी, एल आणि टी या वॉर्डमधून प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला.

टॅग्स :मुंबई