Join us  

मिठीलगतच्या झोपड्यांवर पालिकेची तोडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 7:00 AM

पवई येथील मोरारजीनगरमधील फिल्टरपाडा येथे ऐन पावसाळ्यात मिठी नदीच्या लगत असलेल्या झोपड्या तोडण्यात आल्या आहेत.

मुंबई - पवई येथील मोरारजीनगरमधील फिल्टरपाडा येथे ऐन पावसाळ्यात मिठी नदीच्या लगत असलेल्या झोपड्या तोडण्यात आल्या आहेत. मिठी नदीची रुंदी वाढवताना नदीच्या बाजूने संरक्षक भिंती बांधणे, नदी पात्रातील लोकांचे पुनर्वसन करणे, अशा उपाययोजना आखण्याचे ठरले आहे. परंतु मोरारजीनगर येथे पावसाळ्यात महापालिकेने तोडक कारवाई करून नागरिकांना बेघर केले आहे. महापालिकेला पावसातच जाग आली का? पावसाळ्याआधी किंवा पावसाळ्यानंतर तोडक कारवाई केली असती तर चालले नसते का, असा सवाल रहिवाशांनी केला आहे.मोरारजीनगर येथील मिठी नदीच्या प्रकल्पातील साडेसात मीटरच्या परिसरातील ज्या झोपड्या आहेत; त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. परंतु पावसाळा सुरू झाला असून पावसात रहिवाशांची घरे तोडली गेली तर नागरिक राहणार कुठे? त्यामुळे सध्या तोडक कारवाई थांबवली आहे. २००० सालाचा पुरावा ज्या नागरिकांकडे नाही त्यांची घरे तोडली गेली. तसेच महापालिकेला पत्र देऊन सांगण्यात आले आहे की, पावसाळा संपल्यावर ज्यांची घरे अनधिकृत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, असे शाखाप्रमुख मनिष नायर यांनी सांगितले.यासंदर्भात एस वॉर्डचे सहायक आयुक्त संतोष धोंडे म्हणाले की, मिठी नदीच्या प्रकल्पामध्ये आलेल्या झोपड्यांवर तोडक कारवाई करण्यात आली असून त्यात पात्र आणि अपात्र झोपडपट्ट्या तोडण्यात आल्या आहेत. सध्या पाऊस जास्त असल्याकारणाने झोपड्या तोडण्यात आल्या नाहीत. परंतु मिठी नदीच्या प्रकल्पात जी घरे येतील ती तोडली जाणार आहेत. मिठी नदीच्या वाढत्या प्रदूषणावर नदीत जाणारे सांडपाणी बंद करण्याचे योजले आहे. त्यामुळे मिठी नदीचे रुंदीकरण करून सांडपाणी सोडण्याची व्यवस्था केली जाणार आहे.पावसाळ्यातकारवाई का?च्परिसरातील ज्या झोपड्या तोडण्यात आल्या आहेत त्यांनी भर पावसात जायचे कुठे, असा सवाल केला आहे.च्त्यातील काही रहिवासी सध्या भाड्याच्या घरात राहत असून काही जणांनी तेथेच प्लॅस्टिक टाकून सहारा घेतला आहे.काही रहिवासी पात्र असून त्यांना अपात्र करण्यात आले आहे. तसेच काही रहिवाशांना नोटीस आल्या असून काहींना नोेटिसा आल्या नाहीत. तसेच अपात्र लोकांकडून पैसे मागून त्यांना पात्र करण्याचा गोंधळ सुरू आहे.- भानुदास सकटे,स्थानिक कार्यकर्ता

टॅग्स :मुंबईबातम्या