Join us  

उद्धव ठाकरेंची सामना संपादकीयमधून मुंबई उच्च न्यायालयावर टीका

By admin | Published: February 29, 2016 10:23 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयावर टीका केली आहे. 'माय लॉर्ड, जरा जपून!शिवरायांच्या वाटेला जाऊ नका!!' असा सज्जड दमच न्यायालयाला भरण्यात आला आहे

 
ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. २९ - सामना संपादकीयमधून मुंबई उच्च न्यायालयावर टीका करण्यात आली आहे. 'माय लॉर्ड, जरा जपून!शिवरायांच्या वाटेला जाऊ नका!!' असा सज्जड दमच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून न्यायालयाला भरण्यात आला आहे.  मुंबई उच्च न्यायालयाने माझगाव कोर्टाची मारत दुरुस्त करा, नाहीतर समुद्रात होणारे स्मारक रोखू असं काल म्हणलं होत त्यावर सामना संपादकीयमधून टीका करण्यात आली आहे.  यावेळी न्यायाधीशांचा उल्लेख 'रामशास्त्री' असा करत  मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन ‘रामशास्त्र्यां’नी छत्रपती शिवाजी महाराजांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला असल्याचंदेखील उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 
सामना संपादकीयमधील मुद्दे - 
-  आपली न्यायालये सध्या न्यायदानापेक्षा ‘कायदाबाह्य’ विषयांत जरा जास्तच रस घेऊ लागली आहेत. आमच्या न्यायालयांच्या तोंडास राजकारण्यांचे रक्त लागले आहे. हे तोंड वाघाचे की लांडग्याचे हे ज्याचे त्याने ठरवावे. जो समोर येईल त्याचे लचके न्यायमंदिरात तोडले जात असतील तर तेथे डॉ. आंबेडकरांचा कायदा नसून जंगलचा कायदा आहे काय? असा प्रश्‍न पडतो. 
 
- मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन ‘रामशास्त्र्यां’नी छत्रपती शिवाजी महाराजांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला. रामशास्त्र्यांनी लोकनियुक्त सरकारच्या मानेवर सुरा ठेवून खंडणी मागावी अशा आवेशाने सांगितले की, ‘माझगाव कोर्टाची इमारत दुरुस्त करा, नाहीतर समुद्रात होणारे स्मारक रोखू!’ ही धमकीच म्हणावी लागेल. 
 
- अशी धमकी एखाद्या गुंडाने किंवा राजकीय कार्यकर्त्याने दिली असती तर त्याच्यावर खंडणी, जबरन वसुली, किडनॅपिंग, चोरी अशी विविध कलमे लावून गुन्हा दाखल केला असता. पण तोच ‘गुन्हा’ न्यायमंदिरात झाला असेल तर शिक्षा कुणाला ठोठावायची? 
 
- रामशास्त्र्यांनी आतापर्यंत सरकारी कामात अनेकदा हस्तक्षेप केला आहे, पण आता शिवस्मारकावरच ताशेरे मारल्यामुळे महाराष्ट्राच्या श्रद्धा व अस्मितेवरच हातोडा पडला आहे. 
 
- ‘‘माझगाव कोर्टाची इमारत दुरुस्त करा, नाहीतर समुद्रात होणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक रोखू!’’ असा दम एकवेळ दळभद्य्रा पाकिस्तानी अफझलखानाने दिला असता तर त्या अफझलखानाचा आणखी एक कोथळा मराठी माणसाने काढला असता 
 
- गळक्या कोर्टावरून तुम्ही छत्रपती शिवाजीराजांचा अवमान करणार असाल तर या रामशास्त्र्यांची डोकी खरोखरच ठिकाणावर आहेत काय? हा प्रश्‍न महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशाची जनता विचारल्याशिवाय राहणार नाही 
 
- जे रामशास्त्री आज शिवस्मारकाच्या बाबतीत ‘बेताल’ विधान करीत आहेत तेच रामशास्त्री मुसलमान, ख्रिश्‍चन व बौद्ध धर्मातील श्रद्धास्थानांविषयी इतकी बेताल विधाने करू शकतील काय? 
 
- राजाचे शिवस्मारक रोखण्याची भाषा कराल तर याद राखा! होय, माय लॉर्ड! तुमच्याविषयी पूर्ण आदर ठेवूनच आम्ही हे निर्भीडपणे सांगत आहोत. तुमचा कायदा तुमच्यापाशी. महाराष्ट्र फक्त शिवरायांना पुजतो व त्यांचाच कायदा मानतो!