Join us  

मुंबई, वारसा आणि त्याचे भवितव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 4:06 AM

------------------------------------------आज जागतिक वारसा दिनी या साऱ्याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतो आहे आणि त्याचबरोबर नगरीकरणाच्या प्रक्रियेत हा वारसा जपण्याविषयी ...

------------------------------------------

आज जागतिक वारसा दिनी या साऱ्याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतो आहे आणि त्याचबरोबर नगरीकरणाच्या प्रक्रियेत हा वारसा जपण्याविषयी चिंता भेडसावत आहे. जागेचा प्रश्न, वारसा जतनाच्या प्रक्रियेतील गुंतवणूक, वारसा स्मारकांचा मालकी हक्क, शासकीय व अशासकीय व्यवस्थांच्या मर्यादा अशा अनेक नागरी प्रश्नांना तोंड देत हा वारसा आजही उभा आहे. या मूर्त वारशाशी संबंधित अनेक कथा, परंपरा आज विस्मृतीच्या उंबरठ्यावर आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी आपल्या परंपरा विसरले आहेत, त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. अनेक लोकपरंपरा लुप्त होत आहेत. हे सार जपायचं कसं? त्याला आर्थिक पाठबळ कुठून आणायचं? हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी वस्तुसंग्रहालये आणि संस्था हे सारं कसं? सांभाळणार?

सारे प्रश्न पुढे उभे असताना वारसा संवर्धन आणि जतनाचा विचार करावासा वाटतो तो थोड्या प्रमाणात का होईना असलेल्या लोकसहभागातून. तरुण पिढीतील काही जण या बद्दल आग्रही आहेत हे बघून आशा पालवतात. यातूनच वारसाकेंद्रित पर्यटनाचा विकास होत आहे. अर्थातच हे पर्यटन विकास पावत असताना आपल्या सर्वांवरच अनेक जबाबदाऱ्या येतात. वारसा स्थळांवर वावरण्याचे नियम आणि निर्बंध कडक असणे गरजेचे आहे. यासाठी वारसा पर्यटनाचे नियोजन करणे ही पहिली पायरी असेल. घारापुरीसारख्या एखाद्याच स्थळाला होणारी अलोट गर्दी टळण्यासाठी स्थानिक वारसा स्थळांचे नियोजन आणि जाहिरात करणे गरजेचे आहे. वारशाचा सर्वांगीण समावेश होणे गरजेचे आहे. विविध वयोगटाच्या, सांस्कृतिक आणि आर्थिक पार्श्वभूमीच्या पर्यटकांना सामावून घेण्याची क्षमता विकसित करणे गरजेचे आहे. यासाठी मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचे नियोजन करणे आणि त्यासाठी शास्त्रीय पद्धतीने त्यांची माहिती गोळा करून त्यांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. यासाठी विद्यापीठ पातळीवर पुरातत्व विभाग विकसित व्हायला हवेत. ही स्मारके स्वयंपूर्ण कशी होतील, याचा विचार होणे गरजेचे आहे.

स्थानिकांना यातून मिळणारा रोजगारच या वारशाच्या जतनातील कळीचा मुद्दा ठरणार आहे. आज पूर्ण जग कोरोना विषाणूच्या तावडीत सापडले आहे. अर्थव्यवस्थेवर याचा मोठा विपरीत परिणाम झाला आहे. आपल्या पूर्वजांनी उभ्या केलेल्या या वारशाविषयी बोलण्यास अथवा विचार करण्यास आपल्याला आज सवडच नाही. आज माणूस जगणे गरजेचे आहे. परंतु आपल्या पूर्वजांनीही अशा अनेक साथीच्या रोगांचा सामना केला, त्यातून ते तगले. हा वारसा आपल्याला अशाच पूर्वजांच्या कथा सांगतो आहे. येणाऱ्या काळात अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी हाच वारसा कटिबद्ध असेल. येत्या काळातही आपण आपल्या पूर्वजांचे योगदान व आपली कल्पकता आणि बुद्धिमत्ता या जोरावरच फिनिक्स पक्ष्यासारखे पुन्हा उभे राहणार आहोत. हाच संकल्प आज या जागतिक वारसा दिनी आपण करूयात!

फोटो ओळ : हाफकिन इन्स्टिट्यूट हे माणसाने बुद्धिमत्तेच्या जोरावर साथीच्या रोगांवर मिळवलेल्या विजयाचे एक स्मारक मानावे लागेल.

- सूरज पंडित