लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य सरकारने राज्यातील विविध नेत्यांची विशेषतः विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली. यात राजकारण नसल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी सत्ताधाऱ्यांशी संबंधित लोकांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याने टीका होत आहे. विशेषतः युवा सेनेचे वरिष्ठ सचिव सरदेसाई यांना एक्स दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आल्याने भाजप आणि मनसेने शिवसेनेला लक्ष्य केले आहे.
राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, नारायण राणे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, रामदास आठवले, आदी नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली. याचवेळी वरिष्ठ सचिव सरदेसाई, शत्रुघ्न सिन्हा, उज्ज्वल निकम यांची सुरक्षा वाढवली. सरदेसाई यांच्या सुरक्षेत वाढ केल्याने भाजप आणि मनसेने राजकीय टोलेबाजी केली आहे. ‘सरदेसाईंच्या मुलाला सुरक्षा देऊन महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचे आणि योग्य पाऊल उचलले आहे. त्याला जास्त सुरक्षेची नितांत गरज होती. कारण त्याने मंत्रालयातील अनेक फाईल्स दाबून ठेवल्या आहेत. त्यामुळे अनेक नोकरशाह त्याच्यावर नाराज आणि संतापलेले आहेत. त्यामुळे त्याला सुरक्षा पुरवण्याची खऱ्या अर्थाने गरज होती’, असे उपरोधिक टि्वट भाजप आमदार नीतेश राणे यांनी केले आहे. तर, भाजप समर्थकांनी वरुण सरदेसाई हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ असल्यानेच सुरक्षा देण्यात आल्याचा आरोप केला आहे.
तर, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी वरुण सरदेसाई यांना पुरवण्यात आलेल्या सुरक्षेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. ‘वरुण सरदेसाई यांना दिलेली सुरक्षा म्हणजे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे वाक्य मुख्यमंत्र्यांनी एकदम गांभीर्याने घेतलेले दिसते’ असा टोला देशपांडे यांनी लगावला.
...............................................