Join us

नवीन नाटकांच्या नांदीकडे मराठी नाट्यसृष्टीचे लक्ष..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:12 IST

अजून वाट पाहावी लागणारराज चिंचणकरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मराठी नाट्यसृष्टी एकीकडे ‘अनलॉक’ होत असतानाच; मागील पानावरून ...

अजून वाट पाहावी लागणार

राज चिंचणकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मराठी नाट्यसृष्टी एकीकडे ‘अनलॉक’ होत असतानाच; मागील पानावरून पुढे सुरू, असा राग आळवत आहे. याचे कारण म्हणजे, लॉकडाऊनपूर्वी सुरू असणाऱ्या नाटकांनीच पुन्हा एकदा रंगभूमीवर ‘एन्ट्री’ घेतली आहे. परिणामी, नाट्यसृष्टीचा पडदा उघडत असला, तरी रसिकांना मात्र नवीन नाटकांची अजून वाट पाहावी लागणार आहे.

जानेवारी महिन्याच्या अखेरीस काही नवीन नाटके रंगभूमीवर येणार असल्याची चर्चा असली, तरी सध्या मात्र मराठी नाट्यसृष्टीचे लक्ष नवीन नाटकांच्या नांदीकडे लागले आहे. गेल्या मार्च महिन्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर झाला आणि नाट्यसृष्टीवर पडदा पडला. ५ नोव्हेंबरच्या मराठी रंगभूमी दिनापासून नाट्यगृहांत ५० टक्के क्षमतेने नाटके सादर करण्यास परवानगी मिळाली. मात्र रंगभूमीवर प्रत्यक्ष नाटक सादर होण्यास डिसेंबर महिना उजाडला. तब्बल ९ महिन्यांच्या काळानंतर सुरू होणाऱ्या नाटकांना रसिकांचा कसा प्रतिसाद मिळेल, याची शंका नाट्यसृष्टीला होती.

डिसेंबर महिन्यात जी काही नाटके रंगभूमीवर आली; त्यांना रसिकांनी चांगली गर्दी केली. साहजिकच, नाट्यसृष्टीतील मंडळींच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु, या सर्व नाटकांमध्ये लॉकडाऊनमुळे बंद झालेलीच नाटके होती. त्यामुळे, अनलॉकच्या प्रक्रियेत नवेकोरे नाटक कधी पाहायला मिळणार, याची उत्सुकता रसिकांना लागून राहिली होती. सध्या नाट्यसृष्टीचा फेरफटका मारला असता, एखाद्-दोन नव्या नाट्यकृती रंगभूमीवर आलेल्या दिसल्या, तरी जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभी काही नवीन नाटके रंगभूमीवर येण्यास सज्ज होत असल्याचे स्पष्ट होत आहे. तरीही, नाट्यसृष्टी अगदी पूर्वीप्रमाणे सक्षमतेने सुरू होण्यास मार्च महिना उजाडेल, अशी चर्चा नाट्यवर्तुळात आहे.

नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेने सुरू

सध्या ५० टक्के क्षमतेने नाट्यगृहे सुरू असली, तरी काही लोकप्रिय नाटकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ‘५० टक्क्यांत हाऊसफुल्ल’, अशा समाधानात रंगकर्मी व निर्माते आहेत. पूर्ण क्षमतेने नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी मिळाल्यावर खऱ्या अर्थाने नाट्यसृष्टीला बहर येणार आहे. साहजिकच, नव्या नाटकांची ‘एन्ट्री’सुद्धा धडाक्यात होईल, असा विश्वास नाट्यसृष्टीला आहे.