Join us  

Maharashtra Government: राष्ट्रपती राजवटीच्या पार्श्वभूमीवर राज्यात विशेष सुरक्षा व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 6:00 AM

राष्ट्रपती राजवट लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर घातपाती कृत्य किंवा अनुचित प्रकार घडण्याच्या शक्यतेमुळे पोलिसांनी पूर्णपणे खबरदारी बाळगण्याची सूचना केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने केली आहे.

मुंबई : राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे तसेच राष्ट्रपती राजवट लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर घातपाती कृत्य किंवा अनुचित प्रकार घडण्याच्या शक्यतेमुळे पोलिसांनी पूर्णपणे खबरदारी बाळगण्याची सूचना केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने केली आहे. त्यामुळे अयोध्या बाबरी मशीद खटला निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात तैनात पोलीस बंदोबस्त काही प्रमाणात अद्यापही कायम ठेवण्यात आला आहे. राष्टÑपती राजवट लागू झाल्याने विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.विविध राजकीय पक्ष, संघटना आणि त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हालचालीवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.अयोध्या खटल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या आठवड्याभरापासून कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. निकालानंतर कोणताही अनुचित प्रकार न घडल्याने पोलिसांनी समाधानाचा सुस्कारा सोडला.मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाला ३ आठवडे उलटूनही अद्याप नवीन सरकार अस्तित्वात आलेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काळजीवाहू सरकारकडून कार्यभार चालविला जात आहे. मात्र नवीन सरकार स्थापन करण्यास भाजपबरोबर अन्य सेना व कॉँग्रेस आघाडीला अद्याप पूर्ण यश मिळालेले नाही. त्यामुळे राजकीय अस्थिरता कायम आहे.राज्यात निर्माण झालेल्या या राजकीय अस्थिरतेचा फायदा समाजकंटक व देशद्रोही संघटनांकडून घेतला जाण्याची शक्यता असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जाऊ शकतो, त्यामुळे योग्य ती खबरदारी बाळगण्यात यावी. महत्त्वाची शहरे, ठिकाणे, गर्दीच्या स्थळी विशेष सुरक्षा तैनात करण्यात यावी, अशा सूचना तपास यंत्रणांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार आयोध्या खटल्याच्या निकालावेळी लावलेला बंदोबस्त शिथिल केला असला तरी आणखी काही दिवस अधिकच्या सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन करावे, असे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले आहेत.