Maharashtra Government: वाटाघाटींमुळे सत्तास्थापना लांबणीवर; काँग्रेसचा निर्णय पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 06:46 AM2019-11-16T06:46:01+5:302019-11-16T06:46:41+5:30

राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलेला असतानाच खातेवाटप आणि इतर पदांबाबत शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीत सहमती होणे बाकी आहे,

Maharashtra Election, Maharashtra Government: maharashtra power decision of the Congress hicommand court | Maharashtra Government: वाटाघाटींमुळे सत्तास्थापना लांबणीवर; काँग्रेसचा निर्णय पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात

Maharashtra Government: वाटाघाटींमुळे सत्तास्थापना लांबणीवर; काँग्रेसचा निर्णय पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात

Next

मुंबई : राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलेला असतानाच खातेवाटप आणि इतर पदांबाबत शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीत सहमती होणे बाकी आहे, तसेच कॉँग्रेसबाबतचा निर्णय आता दिल्लीत होणार असल्याने सरकार स्थापनेस विलंब होण्याची शक्यता आहे. राज्यात १७ नोव्हेंबरपूर्वी सत्ता स्थापन होणे शक्य नाही. अनेक पैलूंवर चर्चा सुरू असल्याने आणखी वेळ लागेल, असे स्वत: शरद पवार यांनीच म्हटले आहे. तर दुसरीकडे, आमच्याशिवाय सरकार होऊ शकत नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्याने राजकीय वावड्यांना ऊत आला आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू असून, सरकार चालविण्यासाठी ४० कलमी किमान समान कार्यक्रम निश्चित करून तिन्ही पक्षांच्या श्रेष्ठींकडे पाठविला आहे. आता शरद पवार हे स्वत: सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. शिवसेनेला सरकारसाठी पाठिंबा देण्याची भूमिका सोनिया गांधी यांनी घ्यावी, यासाठी पवार त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करतील, असे समजते.
काँग्रेस व राष्ट्रवादीचे राज्यातील नेते याबाबत शिवसेनेच्या नेत्यांशी सातत्याने चर्चा करीत आहेत. काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्यास हे सरकार टिकेल, अशी अट राष्ट्रवादीने घातली आहे. त्यासाठीच पवार आधी ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्याशी व नंतर सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करतील.
>मुख्यमंत्रिपद सेनेकडेच
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांचे खातेवाटपावर जवळपास एकमत झाले असून, ५ वर्षे मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच राहणार असून, सेनेला १६, राष्ट्रवादी १४ तर कॉँग्रेसला १२ मंत्रिपदे मिळतील. शिवाय नगरविकास व अर्थ शिवसेनेकडे, गृहखाते राष्ट्रवादी तर महसूल काँग्रेसकडे राहण्याची शक्यता आहे.
>भाजपचा दावा अजूनही कायम
सत्तास्थापनेचा भाजपचा दावा अजूनही कायम आहे. भाजपशिवाय राज्यात स्थिर सरकार येऊ शकत नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या बैठकीत मांडली. आमचे सर्वाधिक १०५ आमदार निवडून आले असून, अपक्ष व इतर पक्षांसह आमचे संख्याबळ ११९ आहे, असा दावा पाटील यांनी केला. त्याच वेळी सत्तास्थापनेबाबत कोणाशीही चर्चा सुरू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
>आठवडाभरानंतरच चित्र स्पष्ट होणार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी दिनी म्हणजे १७ नोव्हेंबरला शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, अशी शक्यता मात्र दिसत नाही. आणखी किमान आठवडाभर तरी सत्ता स्थापनेबाबतचे चित्र स्पष्ट होणार नाही.
किमान समान कार्यक्रमावर तिन्ही पक्षांच्या नेतृत्वाची सहमती, मंत्रिपदे
व महामहांडळांसह अन्य पदांच्या वाटपाचा फॉर्म्युला आणि मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्याबाबत अंतिम सहमती होण्यास वेळच लागणार आहे.
राज्यातील महापूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी, यासाठी काँग्रेस, राष्टÑवादी आणि शिवसेनेचे नेते शनिवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: maharashtra power decision of the Congress hicommand court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.