Join us  

आइसक्रीमचे बोट लागल्याने चाकूने वार

By admin | Published: September 28, 2016 1:43 AM

आइसक्रीमने माखलेले बोट लागल्याने रागाच्या भरात २५ वर्षीय तरुणाने तीन जणांवर चाकूहल्ला केल्याची खळबळजनक घटना भांडुपच्या महाराष्ट्रनगरात घडली.

मुंबई : आइसक्रीमने माखलेले बोट लागल्याने रागाच्या भरात २५ वर्षीय तरुणाने तीन जणांवर चाकूहल्ला केल्याची खळबळजनक घटना भांडुपच्या महाराष्ट्रनगरात घडली. सोमवारी सायंकाळी ७च्या सुमारास ही घटना घडली.भांडुपच्या हनुमाननगर परिसरात राहणारा अविनाश भोसले हा तरुण त्याचा मित्र सनी गायकवाड आणि मुरगन यांच्यासोबत महाराष्ट्रनगरमधील गोपाळ दूध डेअरीजवळ सोमवारी सायंकाळी आइसक्रीम खात उभा होता. ७च्या सुमारास येथे आलेल्या २५ वर्षीय तरुणाला मुरगन याचे आइसक्रीममध्ये लागलेले बोट लागले. या तरुणाने थेट मुरगनला शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. मुरगनच्या वतीने माफी मागत अविनाशने प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला; मात्र या तरुणाने काहीच ऐकून न घेता स्वत:जवळील चाकूने अविनाशला भोसकून त्याच्या दोन मित्रांवर वार करीत पळ काढला. याची माहिती मिळताच पोहोचलेल्या भांडुप पोलिसांनी तिन्ही जखमींना उपचारासाठी अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. (प्रतिनिधी)