Join us  

विकसित राष्ट्राच्या उभारणीत युवकांची महत्वाची भूमिका- राज्यपाल रमेश बैस

By रेश्मा शिवडेकर | Published: February 07, 2024 4:50 PM

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ सोहळा संपन्न, मंत्री चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती

रेश्मा शिवडेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विकसित राष्ट्राच्या उभारणीमध्ये युवकांची महत्वाची भूमिका असून विकसित भारताच्या संकल्पनेत युवकांना योगदान देता यावे, त्यांचा सक्रीय सहभाग वाढवा यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत@२०४७: व्हॉइस ऑफ युथ’ हा उपक्रम जाहीर केला आहे, असे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले. 

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ सोहळा बैस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या प्रसंगी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी,प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे, प्रभारी कुलसचिव  डॉ. बळीराम गायकवाड, प्रभारी संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ  डॉ. प्रसाद करांडे प्राध्यापक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. 

राज्यपाल म्हणाले की,  सर्व यशवंत आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना  खूप आनंद होत आहे.आजचा क्षण हा केवळ या गुणवंत विद्यार्थ्यांसाठीच नाही तर प्राध्यापक, पालक यांच्यासाठी देखील महत्वाचा क्षण आहे. 

राज्यपाल म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प केला आहे. भारताच्या सुवर्ण युगाची काळात आजची  युवा पिढी महत्वाची भूमिका बजावणार, आज मिळालेल्या पदवीच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तुत्व गाजवणार आहे.  विद्यापीठातून पदवी घेवून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि विद्यापीठावर देश घडविण्याची मोठी जबाबदारी आहे.

मुंबई शहर सांस्कृतिक एकात्मता राष्ट्रीय एकात्मतेचे  प्रतिबिंब आहे.येथील अथक कार्यसंस्कृती या शहराची वैशिष्ट्ये आहेत. या संस्कृतीला आत्मसात केल्यानंतर  जगाच्या पाठीवर कुठेही गेलात आणि कितीही  आव्हाने आली तरी ती आव्हाने यशस्वीपणे पूर्ण करण्याची ताकत या विद्यार्थ्यांकडे असेल.

नवीन शैक्षणिक  धोरणात  आंतरविद्याशाखीय आणि बहुविद्याशाखीय संशोधन अनिवार्य करून  समाजाच्या आणि  मानवतेच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केले आहे.यात कौशल्य विकास व रोजगार क्षमता आणि उद्योजकता वाढीला प्रोत्साहन दिले आहे. एका बाजूस ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य तर दुसरीकडे विकसित भारत संकल्पनेत सहभागी होऊन दर्जेदार शैक्षणिक संस्था,कुशल मनुष्यबळ उपलब्धता याकडे अधिक लक्ष दिले आहे.- चंद्रकांत पाटील

नवीन शैक्षणिक धोरणामध्ये नवीन संशोधनाला अधिक प्रोत्साहन देण्यात आले आहे. विकासीत भारतासाठी युवक, महिला,शेतकरी आणि शिक्षण हे प्रमुख स्तंभ आहेत.याला अधिक विकसित केले तर त्याचे सकारात्मक परिमाण देशाच्या विकासावर होतील.- जगदीश कुमार

टॅग्स :चंद्रकांत कुलकर्णीमुंबई विद्यापीठ