Join us  

गिरण्यांतील अधिकाऱ्यांना पूर्ण वेतन तर कर्मचाऱ्यांना ५० टक्के वेतन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 12:54 AM

खासदार अरविंद सावंत यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या गिरण्या पूर्ववत चालू करण्याचा आग्रह धरणारे पत्र केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांना पाठविले होते.

मुंबई :  लॉकडाऊनमुळे बंद असलेले महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे चालू झाले. परंतु एन.टी.सी.च्या मुंबईतील टाटा, पोदार, इंडिया युनायटेड क्र. ५, दिग्विजय तसेच मुंबईबाहेरील बार्शी, अचलपूर या सहा गिरण्या मात्र अद्याप बंद आहेत. येथील अधिकाऱ्यांना पूर्ण वेतन तर कर्मचाऱ्यांना अर्धे वेतन दिले जात आहे.

एका कर्मचाऱ्याने सांगितले की, लॉकडाऊनमध्ये कर्मचारी आणि अधिकारी घरी होते. मात्र अधिकाऱ्यांना पूर्ण वेतन तर कर्मचाऱ्यांना अर्धे वेतन दिले जात आहे. जूनमध्ये लॉकडाऊन शिथिल केल्यानंतरही गिरण्या मात्र बंदच आहेत. आताही अर्धेच वेतन मिळत आहे. गिरण्यांमध्ये एकूण ४ हजार कर्मचारी आहेत. तर तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना बंद करण्यात आले आहे. 

खासदार अरविंद सावंत यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या गिरण्या पूर्ववत चालू करण्याचा आग्रह धरणारे पत्र केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांना पाठविले होते. त्यावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले सहा महिने एन.टी.सी.च्या वेगवेगळ्या गोडाऊनमध्ये सुमारे १५० कोटी रुपये किमतीच्या तयार कपड्याचा माल विक्रीअभावी पडून आहे. असे त्याने सांगितले. 

इतर वेळी या गिरण्यांचे यान महाग असल्याने माल पडून राहत होता. अद्यापही अनेक कारखाने बंद आहेत. त्यामुळे या गिरण्यांच्या यानाला मागणी वाढली आहे. १५० कोटींचा पडून राहिलेला मालही संपत आला आहे. तरीही अधिकाऱ्यांना पूर्ण वेतन अन् कर्मचाऱ्यांना अर्धे वेतन दिले जात आहे.-गिरणी कामगार