वसई : वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारतीवर कारवाई करण्यास प्रशासनाने सुरूवात केली आहे. काल नालासोपारा आचोळे येथे असलेली एक धोकादायक इमारत महानगरपालिकेने जमीनदोस्त केली. वसई-विरार उपप्रदेशात शहरी व ग्रामीण भागात अनेक धोकादायक इमारती आहेत. गेल्यावर्षी नालासोपारा पुर्व भागात अशीच एक इमारत कोसळून एकाचा बळी गेला होता. त्यामुळे यंदा प्रशासनाने या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन पावसाळ्यापुर्वी धोकादायक इमारती पाडण्यास सुरूवात केली. काल त्यांनी आचोळे रोड येथे धोकादायक अवस्थेत असलेली इमारत तोडली. या इमारतीमधील रहिवाशांनी यापुर्वीच सदर इमारत रिकामी केली होती. अद्यापही शेकडो धोकादायक इमारती उपप्रदेशात असून त्यावर पावसाळ्यापुर्वी कारवाई करणे प्रशासनाला शक्य होणार नसल्याचे दिसुन येत आहे. ग्रामीण भागातील अशा धोकादायक इमारतीबाबत कारवाई करण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही त्यामुळे अनेक इमारतीमध्ये रहिवाशी जीव मुठीत धरून राहत आहेत. (प्रतिनिधी)
वसईत धोकादायक इमारत जमीनदोस्त
By admin | Updated: May 29, 2014 01:51 IST