विशेषत: परदेशातील यंत्रणांकडे सुविधा नाहीत, अशा सुविधा आपल्याकडे आहेत. मात्र केवळ हलगर्जीपणामुळे आगीच्या घटनांमध्ये जीवितहानी होत असते. परंतु आता भविष्यात मुंबईत लागणाऱ्या आगींची संख्या कशी कमी होईल, याकडे अधिकाधिक लक्ष देण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्ही, आम्ही आणि सर्वांनीच जनजागृती करीत पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांदळे यांनी ‘लोकमत’च्या कॉफीटेबलच्या माध्यमातून मुंबईकरांना केले. आमचे प्रतिनिधी सचिन लुंगसे यांनी त्यांच्याशी केलेली ही बातचीत...अग्निशमन दलासमोर काय आव्हाने आहेत?यंत्रणा कोणतीही असो, प्रत्येक यंत्रणेसमोर आव्हाने असतात. आता संबंधित यंत्रणा आव्हाने कशी पेलते, यावर सारे काही अवलंबून असते. प्रत्येक यंत्रणेवर एक जबाबदारी असते. तशी ती मुंबई अग्निशमन दलावर आहे. मुंबईचा विकास उत्तरोत्तर होत आहे. आता विकास थांबविणे आपल्या हातात नाही. आणि तो का थांबवावा, हाही प्रश्नच आहे. पण जेव्हा विकास होत असतो तेव्हा आपल्यासमोरची आव्हानेही वाढत असतात. आता नेमके तेच होते आहे. मुंबईचा विकास होतो आहे आणि आव्हानेही वाढत आहेत. आणि याच विकासादरम्यान अत्याधुनिक साधनांच्या मदतीने आगींवर नियंत्रण मिळविले जात आहे. गेल्या महिनाभरात मुंबईत तीन मोठ्या आगी लागल्या, त्याबाबत काही?गोकूळ हाऊस असो, पवई आग असो वा वडाळ्याची आग असो. अग्निशमन दलाने तेथील दुर्घटनांदरम्यान प्राणाची बाजी लावली. कारण आम्ही आमच्यात बदल केला आहे आणि तो अपरिहार्य आहे. पवई दुर्घटनेत रहिवासी घाबरले आणि जीवितहानी वाढली. वडाळ्याच्या आगीने तर दणके दिले. या दुर्घटनेदरम्यान पाण्यावर पसरलेल्या तेलाच्या तवंगास आग लागून पेट्रोलजन्य आग पसरू नये, याकरिता आवश्यक असणारे विशिष्ट प्रकारचे फोम अग्निशमन दलाने वापरल, ज्यामुळे आग पसरण्याचा धोका नियंत्रणात आणता आला. १९८८ सालच्या दुर्घटनेवेळी पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर फोम वापरण्यात आला होता. आता पुन्हा मोठ्या प्रमाणावर फोम वापरण्याची ही दुसरी वेळ होती. सरतेशेवटी फायर रिपोर्टमध्येही काही त्रुटी आहेत, हे आम्ही मान्य करतो. मात्र त्यासाठी अंतर्गत बदल करणे गरजेचे आहे आणि ते केले जात आहेत. झोपडीपासून मोठ्या इमारतींच्या आगींचा आम्ही अभ्यास करीत आहोत. अग्निशमन दलाचे प्रमुख दिवंगत सुनील नेसरीकर यांनी काही प्रकल्प यापूर्वीच मार्गी लावले आहेत.गगनचुंबी इमारतींत दुर्घटना घडतात, त्याविषयी काही?जगात तुम्ही कुठेही जा. आपण इतरांच्या तुलनेत खूप हलगर्जीपणा करीत आहोत. गगनचुंबी इमारतींना आग लागली की अग्निशमन दलावर आरोप केले जातात. पण गगनचुंबी इमारतीला आग लागल्यानंतर लिफ्टचा वापर करणे, हे आत्महत्या करण्यासारखे नाही का? आव्हाने येणारच; पण म्हणून तुम्ही यंत्रणेवर आरोप करून भागणार नाही. तुमच्याकडे तुमची योजनाही तयार पाहिजे.अशाप्रकारची आव्हाने अग्निशमन दल कशाप्रकारे पेलते?मी सुरुवातीलाच म्हटले की जेवढी आमची जबाबदारी आहे तेवढीच प्रत्येकाची आहे. आमचा आणि लोकांचा स्वभाव बदलला पाहिजे. यासाठी एक उत्तम उदाहरण देतो. जेव्हा पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग लहान होते, तेव्हा तेथील अपघातांची संख्या कमी होती. वाहनांचा वेग कमी होता. मात्र आता नव्या गाड्या रस्त्यांवर उतरल्या. त्यांचा वेग वाढला आहे. परिणामी झाले असे, की अपघातांची संख्या वाढली. म्हणजे प्रत्येक गोष्टीला यंत्रणाच जबाबदार असते असे नाही. आणि असे म्हणून मी माझ्यावरची अथवा अग्निशमन दलावरची जबाबदारी झटकत नाही. प्रत्येकाने सुरक्षेच्या गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत.आपले अग्निशमन दल अत्याधुनिक साधनांनी सज्ज आहे?हो नक्कीच. आता पूर्वीचे फायर फायटिंग आणि फायर इंजिन राहिलेले नाही. आम्ही यंत्रणेत मूलभूत बदल केले आहेत आणि करीत आहोत. गगनचुंबी इमारतीच्या आगी विझविण्यासाठी आपल्याकडे उंच शिड्या आहेत. उदाहरण म्हणून मी सांगतो, की न्यूयॉर्कमध्ये ३० मीटरवर रायडर नाही. आपल्याकडे ९० मीटर रायडर आहे. म्हणजे आपण परदेशी यंत्रणेपेक्षाही बलाढ्य आहोत. २६/११ दहशतवादी हल्ल्यादरम्यान ताज आणि ट्रायडंट हॉटेल आगीदरम्यान संबंधित ठिकाणच्या स्प्रिंकल सिस्टीम सुरू झाल्या नाहीत. तेथील यंत्रणेने ऐनवेळी दगा दिला. तेव्हा क्रॉस फायरिंग होत होते. त्या वेळी अग्निशमन दलाने केलेले कार्य कौतुकास्पद होते.मुंबईकरांना काय सांगाल?प्रत्येकवेळी अग्निशमन दलानेच सांगितले पाहिजे असे नाही. हा विषय जनजागृतीचा आहे. आम्ही आमच्या पद्धतीने यासंदर्भातील जनजागृती करीत असतो. वेळेप्रसंगी पोलिसांचीही मदत घेत असतो. आगीबाबत जनजागृती करण्यासाठी मोहिमा हाती घेत असतो. माझे म्हणणे एवढेच आहे, की एखादी दुर्घटना घडल्यास माझी यंत्रणा तिथपर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणजे माझा रिसोर्स बिल्डिंगकडे पोहोचला पाहिजे. पण दुर्घटनेदरम्यान यंत्रणा संबंधित ठिकाणी पोहोचण्यास अडथळे येतात. कारण आपण सर्वच गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. आपणाला त्यांचे गांभीर्य नाही.भविष्यातील योजनांविषयी काय सांगाल?मुंबई अग्निशमन दलाकडे पुढील पाच वर्षांची योजना तयार आहे. मिनी फायर इंजिन असो वा मनुष्यबळाचा विषय असो. आम्ही अत्याधुनिक साधनांना आणखी बळकट करण्यासाठी तत्पर आहोत. आगीशी संबंधित प्रत्येक गोष्टीबाबत जनजागृती सुरू आहे, प्रात्यक्षिके सुरू आहेत. साधी, सोपी आणि सरळ गोष्टी आहे ती म्हणजे अग्निप्रतिबंधक कायद्यानुसार इन्स्टॉलेशन सिस्टीमची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. आता बदल झाले तशी जबाबदारीही वाढली आहे. जगासमोरची आव्हाने वाढत आहेत. आणि आपल्याकडे तर फायर रिस्पॉन्स टीम सर्व्हिस आहे. तुम्हाला दीड वर्षात बदल दिसतील, एवढे नक्की.सरतेशेवटी काय सांगाल?गेल्या तीन वर्षांत मुंबईमधील आगींचे प्रमाण कमी झाले, पण जीवितहानी वाढली आणि याची खंत आहे. माझे वारंवार हेच म्हणणे आहे, की आता सुसंवाद वाढला पाहिजे. महापालिका आयुक्त अजय मेहता अग्निशमन दलाला बळकट करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु आम्हाला सगळ्यांची मदत अपेक्षित आहे. सगळ्यांची म्हणजे नागरिकांची. कारण विषय सुरक्षेचा आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रसारमाध्यमांनी यासाठी मोलाची भूमिका बजावत आगीच्या सुरक्षेबाबात अधिकाधिक जनजागृती केली पाहिजे.
आग विझेल, पण...
By admin | Updated: June 21, 2015 02:00 IST