Join us  

ललित मोदी, आरसीएविरुद्धची कारवाई योग्यच : बीसीसीआय

By admin | Published: May 09, 2014 12:10 AM

ललित मोदींच्या निलंबनानंतर आता आरसीएवरील (राजस्थान क्रिकेट संघटना) निलंबनाची कारवाई योग्यच असल्याचे मत बीसीसीआयतर्फे व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : ललित मोदींच्या निलंबनानंतर आता आरसीएवरील (राजस्थान क्रिकेट संघटना) निलंबनाची कारवाई योग्यच असल्याचे मत बीसीसीआयतर्फे व्यक्त केले आहे. आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांची आरसीएच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाल्यानंतर काही तासांच्या आत बीसीसीआयने आरसीएवर निलंबनाची कारवाई केली. दरम्यान, बीसीसीआयच्या काही माजी उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी आरसीएवरील निलंबनाच्या कारवाईवर टीका केली. त्यात माजी अध्यक्ष शरद पवार यांचा प्रामुख्याने समावेश आहे. बीसीसीआयच्या माजी पदाधिकार्‍यांचे वक्तव्य बोर्डाच्या विरोधात असल्याचे मत बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी व्यक्त केले. आरसीएबाबतच्या निर्णयावर बोर्डाचे माजी पदाधिकारी चुकीची प्रतिक्रिया देत असल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले. मोदी यांच्यावरील निलंबनाची कारवाई योग्य असल्याचे स्पष्ट करताना पटेल म्हणाले, ‘शिस्तभंग आणि चुकीच्या कार्यात सहभाग असल्याचा ठपका ठेवताना २०१० मध्ये तत्कालीन अध्यक्ष शशांक मनोहर यांनी बीसीसीआयच्या नियमानुसार मोदी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे हा निर्णय चुकीचा आहे, असे म्हणता येणार नाही.’ पटेल पुढे म्हणाले, ‘या प्रकरणात मोदी यांनी मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल केला. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. पण या प्रकरणात न्यायालयाने मोदी यांच्या तीन विशेष विनंती याचिका खारीज केल्या आणि बीसीसीआयला नियमानुसार पावले उचलण्याचे निर्देश दिले. मोदी बोर्डाच्या अंतिम निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेऊ शकतात.’ (वृत्तसंस्था)