आचरा : सी वर्ल्ड प्रकल्पाच्या बाजूने वायंगणी-तोंडवली येथील काही ग्रामस्थ उतरले असतानाच सोमवारी रात्री परेल (मुंबई) येथील बैठकीत गावचे मुंबईकर चाकरमानी व सी वर्ल्ड प्रकल्पविरोधी समितीने न्यायालयीन लढा पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. काही ग्रामस्थांनी मात्र प्रकल्पाच्या बाजूने कौल दिला आहे. सी वर्ल्ड प्रकल्पास विरोध हीच भूमिका यापूर्वी घेतलेली असतानाच मुख्यमंत्र्यांच्या कमी जागेत सी वर्ल्ड साकारू, या घोषणेनंतर काही ग्रामस्थांना आशेचा नवा किरण दिसला आहे. सी वर्ल्ड प्रकल्पाच्या समर्थनार्थ काही मंडळी उतरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पुढील दिशा ठरविण्यासाठी गावचे मुंबईकर ग्रामस्थ व प्रकल्पविरोधी संघर्ष समितीच्या मुंबईतील बैठकीत बहुतेकजणांनी विरोधी भूमिका कायम ठेवली. या प्रकल्पाविरोधात न्यायालयीन लढा तीव्र केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे, तर याच बैठकीत काहीजणांनी प्रकल्पाच्या बाजूने आपले मत टाकले आहे. कोणाही ग्रामस्थाला विस्थापित न करता प्रकल्प हवा. गावविकास आराखडा तयार करून कूळकायद्यानुसार न्याय मिळावा, असेही मत काहींनी मांडले. दरम्यान, दोन्ही बाजू ऐकण्यासाठी पालकमंत्री पुन्हा केव्हा बैठक घेतात, याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)प्रकल्पाच्या समर्थनार्थ सह्यांची मोहीम सी वर्ल्ड प्रकल्पाच्या बाजूने असणाऱ्या ग्रामस्थांनी भूधारक गाव विकास कृती समिती स्थापन करून प्रकल्पाचे समर्थन करत सह्यांची मोहीम राबविणार असल्याचे सांगितले.या प्रकल्पाच्या बाजूने असणाऱ्या मंडळींनी दोन्ही गावच्या ग्रामस्थांना न्याय मिळावा हीच भूमिका राहील, असे स्पष्ट केले आहे. त्यांना आशिष पाटील व अन्य ग्रामस्थ मंडळींनी पाठिंबा दिला आहे.
सी वर्ल्ड प्रकल्पविरोधी लढाई सुरूच राहणार
By admin | Updated: March 18, 2015 00:08 IST