Join us  

केईएम रुग्णालयात मृतदेह ताब्यात घेण्यावरून कुटुंबीयांचा गोंधळ; शिवडी अपघात प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 2:33 AM

किडवई पोलिसांनी या प्रकरणी आयपीसी ३०४ ए, हा निष्काळजीपणाबद्दलचा जामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : शिवडी येथे रविवारी सायंकाळी झालेल्या कार अपघाताला सोमवारी वेगळे वळण लागले आहे. या अपघातात जखमी व मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांनी आरोपींविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी केईएम रुग्णालयात आंदोलन केले. दोन मृत तरुणांच्या नातेवाइकांनी या मागणीसाठी रुग्णालयाच्या आवारात पोलिसांविरोधात घोषणाबाजी केल्याने एकच गोंधळ उडाला होता.

दरम्यान, किडवई पोलिसांनी या प्रकरणी आयपीसी ३०४ ए, हा निष्काळजीपणाबद्दलचा जामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर ३०४ बी, हा अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे. ‘जोपर्यंत पोलीस अजामीनपात्र गुन्हा दाखल करीत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,’ अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली आहे. अपघात झाला त्या वेळी इलियास बादी हा दारू पिऊन गाडी चालवत होता, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे. ‘या प्रकरणी तपास सुरू असून इलियास बादीच्या दारूसेवनासंदर्भातल्या चाचण्यादेखील करीत आहोत, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. रविवारी सायंकाळी शहाबाज इलियास बादी(२६) हा त्याच्या पत्नीसोबत कारमधून शिवडीतून माझगावच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता.

या वेळी झकेरिया बंदरजवळ समोरच्या गाडीला ओव्हरटेक करताना शहाबाजचा गाडीवरचा ताबा सुटला. यामध्ये रस्त्याच्या कडेला बसस्टॉपवर उभ्या असलेल्या प्रवाशांना त्याने उडवले. समोर उभ्या असलेल्या ट्रकवर अर्टिगा गाडी आदळली. यामध्ये बसस्टॉपवर उभ्या असलेल्या दर्शन पाटील(१८)चा जागीच मृत्यू झाला, तर कल्पेश घार्गे (२५) या तरुणाचा केईएममध्ये उपचारांदरम्यान मृत्यू झाला.याशिवाय अर्टिगा चालक इलियास बादी, त्याची पत्नी, स्वाती पाटील(४०), निधी पाटील(१२), गौरी नांदगावकर(४०), जय नांदगावकर(१३) हे सहा जण जखमी असून त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :मुंबईकेईएम रुग्णालय