मुंबई : गोविंदा रे गोपाळा.... बोल बजरंग बली की जय आणि ढाक्कुमाक्कुमच्या तालावर धडाक्यात पार पडलेल्या पहिल्यावहिल्या दहीहंडी साहसी खेळ स्पर्धेत ‘एक्सर गोविंदा पथक’ने अतिशय शिस्तबध पद्धतीने थर रचत स्पर्धेत अ (पाच थर) गटात बाजी मारली. ब गटात (सहा थर) पोयसरच्या ‘साई जवान प्रतिष्ठान’ गोविंदा पथकाने आणि महिला गोविंदा पथकाच्या क गटात ‘हिरकणी गोविंदा पथक’ यांनी वर्चस्व राखले.युथ कल्चरल असोशिएशनच्या वतीने साहसी खेळाचा दर्जा प्राप्त झालेल्या दहीहंडी खेळाची पहिलीवहिली स्पर्धा रविवारी मोठ्या उत्साहामध्ये कांदिवली येथील महावीर नगरमध्ये पार पडली. दहीसर, कांदिवली, बोरीवली, मालाड या परिसरातील तब्बल २० गोविंदा पथकांनी या स्पर्धेत सहभाग घेत ६ स्पटेंबरला पार पडणाऱ्या दहीकाला उत्सवासाठी स्वत:ला अजमावले. राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी नुकताच दहीहंडी या खेळाला साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा देण्याचा निर्णय घोषित केल्याने या स्पर्धेला विशेष महत्त्व आले. या स्पर्धेत संघाकडून थर लावताना बाळगोपाळांची संख्या, थर लावण्यासाठी व उतरविण्यासाठी त्यांना लागणारा वेळ, शिस्तबद्धता व कौशल्य यावरून गुणांकन करण्यात आले. (प्रतिनिधी)
एक्सरचे ‘गोविंदा’ ठरले वरचढ
By admin | Updated: August 31, 2015 03:02 IST