Join us  

अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान

By admin | Published: November 18, 2014 10:57 PM

राज्यात अवकाळी पाऊस पडल्याने उन्हापासून थोडासा दिलासा मिळाला असला तरी उन्हाळी पिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

कार्लेखिंड : राज्यात अवकाळी पाऊस पडल्याने उन्हापासून थोडासा दिलासा मिळाला असला तरी उन्हाळी पिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रायगड जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी भातकापणीची कामे अंतिम टप्प्यात होती. अलिबाग तालुक्यात भात पिकानंतर उन्हाळ्यामध्ये अनेक प्रकारची पिके काढली जातात. भात कापणीनंतर शेत नांगरुण त्यामध्ये मुख्यत: वाल, मूग, चवळी, हरभरा, उडीद इत्यादी कडधान्ये टाकली जातात. तर काही शेतकरी भाजी लागवड करतात. यात तोंडली, कारली, दुधी, शिराळी, पडवळ, घोसाळी अशा भाज्यांची प्रामुख्याने लागवड करण्यात येते. मात्र यंदा अवकाळी पाऊस पडल्याने भात शेतीचे तर नुकसान झालेच परंतु या भाज्यावर व्हायरस व व्हिल्ट नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे भाज्या तयार होण्याच्या आधीच शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. औषध फवारणी केली तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा हवामानामध्ये बदल होतच आहे. या भाज्यांच्या बरोबरच फळांचा राजा आंबा पिकाला सुध्दा मोठ्या प्रमाणात या पावसाचा फटका बसण्याची शक्यता बागायतदारांकडून वर्तवण्यात येत आहे. दरवेळी आॅक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया चालू होते. परंतु यावर्षी अजून वातावरण अनुकूल नसल्याने मोहोर लांबवला आहे.