८० हजारांहून अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता : ‘एफसीएफएस’च्या सात फेऱ्यांमध्ये १९ हजार प्रवेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या एफसीएफएस (प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य) फेरीचा शेवटचा दिवस पार पडला असून उरलेल्या रिक्त जागांचा तपशील रविवारी जाहीर होणार आहे. एफसीएफएसच्या ७ फेऱ्यांअंती अकरावीच्या ८० हजारांहून अधिक जागा रिक्त राहण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली. तरीही अकरावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश न मिळाल्याच्या तक्रारी विद्यार्थी संघटनांकडे केल्या आहेत.
एफसीएफएस प्रवेश प्रक्रियेच्या सातव्या टप्प्याअंती मुंबई विभागातून १९ हजार ७२९ प्रवेश झाले आहेत. अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या एफसीएफएस फेरीनंतर रविवारी, ३१ जानेवारीला रिक्त जागांचा तपशील जाहीर हाेईल. मात्र, अद्यापही अनेक विद्यार्थी, पालकांनी त्यांचे प्रवेश कोणत्याच महाविद्यालयात न झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी काेणती प्रक्रिया राबवली जाणार आहे, याचा तपशील जाहीर करावा, अशी मागणी करणारे पत्र युवासेना सदस्यांनी उपसंचालक संदीप संगवे यांना दिले.
* अनेक विद्यार्थी प्रवेशाविना
८० हजारांहून अधिक जागा रिक्त राहण्याची भीती असली तरी अनेक विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश न झाल्याने त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती त्यांना सतावत आहे. त्यांच्या प्रवेशासाठी राबवल्या जाणाऱ्या प्रक्रियेची माहिती लवकरात लवकर जाहीर करावी, अशी मागणी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केली.
.....................