Join us  

पत्रकारांमुळे देशात लोकशाही टिकून - नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 7:13 AM

विचारशून्यता ही देशासमोरची सगळ्यात मोठी समस्या आहे. या परिस्थितीत पत्रकारितेवर वैचारिक निष्ठा टिकवून ठेवून काम करणाऱ्या पत्रकारांमुळेच लोकशाही टिकून आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केले. विश्व संवाद केंद्रातर्फे नारद जयंतीनिमित्त प्रदान केले जाणारे ‘देवर्षी नारद उत्कृष्ट पत्रकारिता’ पुरस्कार त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. माटुंग्याच्या वेलिंगकर इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई  - विचारशून्यता ही देशासमोरची सगळ्यात मोठी समस्या आहे. या परिस्थितीत पत्रकारितेवर वैचारिक निष्ठा टिकवून ठेवून काम करणाऱ्या पत्रकारांमुळेच लोकशाही टिकून आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केले. विश्व संवाद केंद्रातर्फे नारद जयंतीनिमित्त प्रदान केले जाणारे ‘देवर्षी नारद उत्कृष्ट पत्रकारिता’ पुरस्कार त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. माटुंग्याच्या वेलिंगकर इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी रवींद्र दाणी, मोहन बने, नितीन केळकर, विमल मिश्र, डॉ. राहुल रनाळकर, स्वाती तोरसेकर यांना ‘देवर्षी नारद उत्कृष्ट पत्रकारिता’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, तर विश्व संवाद केंद्रातर्फे पत्रसामर्थ्य या विशेषांकाचेही प्रकाशन करण्यात आले.नितीन गडकरी म्हणाले की, आज मालक सांगेल, त्याप्रमाणे पत्रकार लिहीत असतात. काही जण वेगळी कामेही करतात. त्यामुळे समाजात पत्रकारितेबद्दल नकारात्मक मत तयार झाले आहे. राजकीय नेते पत्रकारांनी स्तुती केली, तर खूश होतात. मात्र, एखाद्या वेळी पत्रकाराने काही विरोधी लिहिले, तर लगेच नेते अस्वस्थ होतात. पत्रकारांना नेत्यांच्या चुका दाखविण्याचा अधिकार आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे.१९४७पासून आजपर्यंत देशात खूप बदल झाले आहेत, असे सांगून गडकरी म्हणाले की, समाजवादी, साम्यवादी आणि पुंजीवादी या तिन्ही विचारधारा आज कमी होत आहेत. त्यांची जागा नवीन विचारसरणी घेत आहे. विश्व संवाद केंद्राने या ‘नारद’ पुरस्कारासाठी अर्ज न मागविता, या पुरस्कारासाठी पत्रकारांची निवड केली, याबद्दल आनंद व्यक्त करून गडकरी म्हणाले की, पुरस्कारासाठी अर्ज मागविणे मला योग्य वाटत नाही. कसल्याही अपेक्षा न ठेवता, पत्रकारिता करणाºया या मंडळींचा सन्मान होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.या वेळी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र दाणी, स्वाती तोरसेकर आणि डॉ. राहुल रनाळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष सुधीर जोगळेकर यांनी प्रास्ताविक केले, तर कार्यवाहक मोहन ढवळीकर यांनी आभारप्रदर्शन केले. प्रशांत देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :माध्यमेनितिन गडकरी