Join us  

Coronavirus : पाणीपुरवठा, साफसफाई, बचाव कार्य अविरत सुरू; पालिकेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 1:51 AM

मुंबईतही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकार आणि महापालिकेने काही महत्त्वाची पावले उचलली आहेत.

मुंबई : कोरोनाशी लढा देण्यासाठी रविवारी जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. या काळात १४ तास मुंबई बंद राहील. मात्र अत्यावश्यक सेवांना यामधून वगळले आहे. वैद्यकीय सेवा, घनकचरा व्यवस्थापन, पाणी खाते, मलनिस्सारण व्यवस्था, अग्निशमन दल आणि आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष नेहमीप्रमाणे कार्यरत राहील. त्यामुळे मुंबईतील सफाई, पाणीपुरवठा आणि मदतकार्य सुरूच राहील, असे पालिकेने स्पष्ट केले.मुंबईतही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकार आणि महापालिकेने काही महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्यानुसार शाळा, महाविद्यालय, खासगी कार्यालये बंद आहेत. तर दुकान एक दिवसाआड सुरू असून सरकारी कार्यालयांत उपस्थितीचे प्रमाण २५ टक्के असेल. पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी परिपत्रक काढून कोणत्या सेवा यापुढे सुरू राहतील, याबाबत मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार जल अभियंता, पाणीपुरवठा, घनकचरा, मलनिस्सारण सेवा, अग्निशमन दल, आपत्कालीन नियंत्रण कक्ष आपली सेवा सुरू ठेवतील.यासाठी सेवा सुरू- मुंबईत दररोज तीन हजार ८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. हे पाणी धरणातून जलवाहिनीद्वारे जलाशयात आणि तेथून घराघरात पोहोचविण्यात येते. मात्र प्रत्येक विभागाच्या वेळेनुसार पाणी सोडण्याचे काम करणारे कामगार यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात.- मुंबईतून दररोज सात हजार मेट्रिक टन कचरा जमा होत असतो. कचरा मुंबईतील घराघरांतून एकत्रित करून डंपिंग ग्राउंडवर नेण्यात येतो. एक दिवस हेही सेवा खंडित राहिल्यास मुंबईत कचऱ्याचे ढीग साचून रोगराई पसरेल.- मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणारी वैद्यकीय सेवा आत्यावश्यक मानली जाते. त्यानुसार मेडिकल स्टोअर्स, मेडिकल सेंटर, रुग्णालय, आरोग्य केंद्र सुरू राहणार आहेत.- मुंबईत आग लागण्याच्या दररोज छोट्या मोठ्या घटना घडत असतात. अशा वेळी तत्काळ घटनस्थळी मदत कार्य पोहोचविण्यासाठी अग्निशमन दलास सतत २४ तास कार्यरत राहावे लागते.

टॅग्स :मुंबई