कोरोना : गावाकडे गेलेल्या मेट्रोच्या कामगारांची अखेर घरवापसी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 03:29 PM2020-06-28T15:29:17+5:302020-06-28T15:29:43+5:30

कोरोना काळात आपआपल्या मूळ गावी गेलेले मेट्रो प्रकल्पाचे कामगार परत येऊ लागले आहेत, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला आहे.

Corona: Metro workers who went to the village finally return home | कोरोना : गावाकडे गेलेल्या मेट्रोच्या कामगारांची अखेर घरवापसी

कोरोना : गावाकडे गेलेल्या मेट्रोच्या कामगारांची अखेर घरवापसी

Next


मुंबई : कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मेट्रो प्रकल्पातील बहुसंख्य कामगारांनी आपआपले मुळ गाव गाठले होते. याचा परिणाम मुंबई शहर आणि उपनगरात सुरु असलेल्या मेट्रोच्या कामावर झाला होता. आणि मेट्रोचा कामाचा वेग मंदावला होता. विश्वसनीय सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार कामगारांनी गावाकडचे घर गाठल्याने मेट्रोंचे काम तीन ते सहा महिन्यांनी मागे पडले. मात्र आता कोरोना काळात आपआपल्या मूळ गावी गेलेले मेट्रो प्रकल्पाचे कामगार परत येऊ लागले आहेत, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला आहे. मेट्रो-४, मेट्रो-४ अ आणि मेट्रो-७ प्रकल्पासाठी काम करत असलेले शेकडो कामगार परत असून, आणखी कामगार परतण्याच्या मार्गावर आहेत, असाही दावा प्राधिकरणाने केला आहे.

मुंबई मेट्रो लाईन ४ आणि ४ अ साठी काम करत असलेल्या कामगारांपैकी अनेक कामगार आता परत येऊ लागले आहेत. यातील बहुतांश कामगार हे  कोरोनाच्या काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, पंजाब, मध्य प्रदेश येथील आपआपल्या मूळगावी गेले होते. आता परत येत असलेल्या कामगारांमध्ये अकुशल कामगार ३२८ आहेत. कुशल कामगार २१८ आहेत. एकूण ५४६ कामगार परत आले आहेत. येत्या आठवड्यात बिहार आणि पश्चिम बंगाल येथून आणखी कामगार परत येतील, असा आशावाद प्राधिकरणाने वर्तविला आहे. आठवड्याभरात परतणा-या कामगारांची संख्या २२८ असेल, असाही आशावाद प्राधिकरणाने व्यक्त केला आहे. मेट्रो लाईन ७ चा विचार करता महाराष्ट्रात मूळ गावी गेलेले ३८६ कामगार परत आले आहेत. तर महाराष्ट्राबाहेर आपल्या मूळ गावी गेलेले ११५ कामगार परत आले आहेत. जुलै महिन्यात महाराष्ट्रातून १७५ कामगार परत येतील तर राज्याबाहेरून ७५५ कामगार परत येतील, असा आशावाद प्राधिकरणाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, भूयारी मेट्रो-३ चा विचार करता यासाठी येथे एकूण १५ हजार कामगार काम करत आहेत. मात्र कोरोनामुळे यापैकी अनेक कामगार आपल्या मूळगावी गेले आहेत. परिणामी आता कामगारांची कमतरता आहे. आणि ४ हजार कामगार काम करत आहेत. महिन्याला १ लाख मेट्रीक टन उत्खनन केले जात होते. हे प्रमाण ४३ हजार झाले आहे. महिन्याला १ हजार ५०० मीटर बोगदा खणला जात होता. ते प्रमाण आता ३३० मीटरवर आले आहे. स्लॅबच्या कामाचा विचार करता हे काम १६ हजार चौरस मीटरवरून ४ हजार ७०० वर आले आहेत. एकूण काम ६ महिने पाठी गेले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबई महानगर क्षेत्रातील मेट्रो कामे सुरु करण्याचे आदेश दिले. परिणामी एमएमआरडीएला त्यांच्या कंत्राटदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आता या विकास कामांसाठी एमएमआरडीएसोबत काम करत असलेल्या कंत्राटदारांतर्फे महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील असेलेले मजूर कामावर परत आणण्यात येत आहे.

 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबई मेट्रोच्या अनेक कामांसाठी आम्ही काम करत आहोत. भविष्यात असे अनेक कामगार विकास कामासाठी हजर होतील. ही विकासकामे करत असताना सोशल डिस्टनसिंगचे पालन करत आहोत.
- आर.ए. राजीव, महानगर आयुक्त, एमएमआरडीए
 



राज्य शासनाच्या नियमांचे पालन करत एमएमआरडीएने हाती घेतलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पासाठी पुन्हा मजूर भरतीसाठी विविध माध्यमांच्या आधारे जाहिराती दिल्या. या जाहिरातींना सध्या मजूरवर्गांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहेत. महाराष्ट्रातील तब्बल ३८६ तर महाराष्ट्राबाहेरील ११५ मजूर सध्या मुंबई मेट्रो -७ प्रकल्पासाठी कार्यरत आहेत.पुढच्या महिन्यात महाराष्ट्रातील १७५ तर महाराष्ट्राबाहेरील ७५५ इतकी मजुरसंख्या या प्रकल्पासाठी कार्यरत असेल. महाराष्ट्र व बिहार, गुजरात, पश्चिम बंगालमधील ११ कुशल व निमकुशल कामगार मेट्रो ६ (जोगेश्वरी - विक्रोळी) च्या कामासाठी परत आले. मेट्रो ४ (वडाळा - कासारवडवली) आणि ४ अ - (कासारवडवली ते गायकमुख) च्या कामासाठी ५४६ कामगार परत आलेले आहेत. या दोन मेट्रो प्रकल्पासाठी आणखी २८२ कामगार येत्या काही दिवसांत बिहार आणि पश्चिम बंगालहून परत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आहे.
 

Web Title: Corona: Metro workers who went to the village finally return home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.