Join us

गिर्यारोहकांची चढाई थांबली..!

By admin | Updated: April 26, 2015 02:09 IST

नेपाळमधील गोरक्षेपमध्ये ज्या वेळी भूकंपाचे धक्के बसले तेव्हा अक्षरश: तेथील मोठे दगड नाचणाऱ्या बाहुल्यांप्रमाणे हलत होते आणि क्षणभरात इथले वातावरण भयावह झाले होते.

सायली पाटील - मुंबई नेपाळमधील गोरक्षेपमध्ये ज्या वेळी भूकंपाचे धक्के बसले तेव्हा अक्षरश: तेथील मोठे दगड नाचणाऱ्या बाहुल्यांप्रमाणे हलत होते आणि क्षणभरात इथले वातावरण भयावह झाले होते. काही वेळ नक्की काय होते आहे याची कल्पनाच करवत नव्हती, या घटनेनंतर गिर्यारोहकांची चढाई थांबली. अशी थक्क करणारी प्रतिक्रिया नेपाळमध्ये अडकलेल्या गिर्यारोहकांनी ‘लोकमत’ला दिली.मुंबई हायकर्स, युथ होस्टेल, युवाशक्ती अ‍ॅन्ड हिमालयन अ‍ॅडव्हेंचर्स आणि अनेक गिर्यारोहण संस्थांतून मोठ्या संख्येने गिर्यारोहक नेपाळ, पोखरा, काठमांडू येथे गिर्यारोहणासाठी दाखल झाले होते. मात्र शनिवारी सकाळी येथे हादरविणारा भूकंप झाला आणि त्यांचा थरकापच उडाला. युवाशक्तीच्या गिर्यारोहकांचा एक चमू १६ एप्रिल रोजी नेपाळला रवाना झाला. या चमूत पाच महिला गिर्यारोहकांचा समावेश असून, हे गिर्यारोहक शनिवारी नेपाळमधील गोरक्षेपपासून पुढील प्रवास सुरू करणार तोच येथे भूकंपाचे धक्के जाणवू लागले. परिणामी चढाई रद्द करीत गिर्यारोहकांनी तत्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरण केले. हृषीकेश यादव यांच्या युथ होस्टेल संस्थेतील कोणताही चमू सध्या बेस कॅम्प परिसरात नाही, अशी माहिती मिळाली आहे. स्वत: हृषीकेश यादव हे इतर २० गिर्यारोहकांसह सिक्कीम येथे गेले होते. मात्र तेथील परिसरातही भूकंपाचे हादरे जाणवल्याने सर्व बेत रद्द करण्यात आले असून, यादव अणि इतर पूर्णपणे सुरक्षित आहेत. नेपाळ पर्यटन मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एव्हरेस्ट बेस कॅम्पचे मोठे नुकसान झाले असून, काही गिर्यारोहाकांना प्राण गमवावा लागला आहे. जगभरातील गिर्यारोहक एव्हरेस्ट बेस कॅम्प परिसरात अडकले आहेत.सिक्कीम येथे असणाऱ्या युथ होस्टेलच्या हृषीकेश यादव यांच्याशी संपर्क साधला असतात ते म्हणाले, की गिर्यारोहणावेळी आपत्ती येतच असते. मात्र भूकंपासारख्या घटना अपेक्षित नसतात. अशा आपत्तीबाबत गिर्यारोहकही सजग नसतो. सामान्य पातळीवर संकटसमयी बाळगल्या जाणाऱ्या दक्षतेचे प्रशिक्षण संस्थेत दिले जाते. परंतु भूकंपावेळी तडे गेल्याने बर्फाचे तुटणारे कडे अधिक धोकादायक ठरू शकतात. अशावेळी स्थानिकांची मदत घेऊन बचावकार्य हाती घेणे अधिक फायद्याचे असते.