Join us  

चेंबूर, भांडुपमध्ये दोघांवर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 6:06 AM

भांडुप आणि चेंबूरमध्ये किरकोळ वादातून दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी टिळकनगर आणि भांडुप पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुंबई : भांडुप आणि चेंबूरमध्ये किरकोळ वादातून दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी टिळकनगर आणि भांडुप पोलीस अधिक तपास करत आहेत.चेंबूर येथील रहिवासी असलेला वासीम शेख (२६) आणि त्याचा मित्र अब्दुल शेख (३०) रविवारी रात्री छेडानगर क्रॉस रोडवर उभे होते.याच दरम्यान तिघांनी अब्दुलवर लोखंडी रॉडने हल्ला करून तेथून पळ काढला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेतली. मोबाइल देण्यावरून मित्र अफजल मन्सुरी याच्यासोबत काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याच वादातून त्याच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून टिळकनगर पोलिसांनी तीनही हल्लेखोरांना अटक केली आहे.दुसऱ्या एका घटनेत भांडुपच्या तुलशेतपाडा येथील पाण्याच्या टाकीजवळ उभ्या असलेल्या निरंजन मांडके या ३२ वर्षीय तरुणावर धारदार हत्याराने हल्ला करून आरोपीने पळ काढला. या हल्ल्यात मांडके जखमी झाला आहे. त्याचे नातेवाईक मंगेश तावडे (४५) याच्या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.