Join us  

मुंबईवरच्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर आतंकवाद्यांचा चेहरा बदलतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 2:28 AM

२६ नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. ही घटना जरी नऊ वर्षांपूर्वी घडली असली तरी, तिचे भयानक स्वरूप आठवल्यानंतर आजही थरकाप होतो. लष्कर-ए-तय्यबाच्या दहा भाडोत्री दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईत सहजपणे प्रवेश मिळवला आणि १९७ निष्पाप भारतीय व परदेशी नागरिकांना ठार मारले.

- प्रवीण दीक्षित२६ नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. ही घटना जरी नऊ वर्षांपूर्वी घडली असली तरी, तिचे भयानक स्वरूप आठवल्यानंतर आजही थरकाप होतो. लष्कर-ए-तय्यबाच्या दहा भाडोत्री दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईत सहजपणे प्रवेश मिळवला आणि १९७ निष्पाप भारतीय व परदेशी नागरिकांना ठार मारले आणि ६०० पेक्षा अधिक नागरिकांना जायबंदी केले. या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी हाफिज सय्यद याला अन्य देशांचा विरोध असतानाही पाकिस्तानी न्यायालयाने कैदेतून मोकळे केलेले आहे. त्यामुळे अशाच प्रकारच्या दहशतवादी कारवाया आपल्या सहका-यांसह तो पुन्हा करण्याची शक्यता आहे.नऊ वर्षांनंतर मुंबईतील जीवन पूर्ववत झाले असले तरी त्यामुळे अशा प्रकारच्या घटना पुन्हा होणार नाहीत, याची सतत काळजी घेणे गरजेचे आहे. दहशतवादाला तोंड देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने नौदल, कोस्टल गार्ड, एनएसजी, पोलीस दलामध्ये मोठे फेरबदल केले आहेत. समुद्रमार्गे येणारे प्रत्येक जहाज ओळखण्यासाठीची अत्याधुनिक यंत्रणा नौदलाला उपलब्ध करणे चालू आहे, विविध मोक्याच्या ठिकाणी तळ, हेलिकॉप्टर्स, रडार यंत्रणांनी कोस्टल गार्ड सज्ज करण्यात आले आहे. आतापर्यंत केवळ दिल्लीत असलेली एनएसजी मुंबईसह अन्यत्रही निर्माण केली आहे. पोलीस दलात, सर्व सुविधा, प्रशिक्षण, हत्यारे, वाहनेयुक्त ‘फोर्सवन’ची निर्मिती केली आहे. फोर्सवनमधील प्रशिक्षित अधिकारी राज्यातील प्रत्येक पोलीस घटकामध्ये प्रशिक्षित पोलीस अधिकारी व अंमलदार सुसज्ज ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याशिवाय केंद्र व राज्य सरकारने ४० हून अधिक गस्ती नौका मुंबई व महाराष्ट्राच्या ७२० कि.मी. किनाºयावर सतत उपलब्ध ठेवल्या आहेत. त्याचप्रमाणे मुंबई शहर, ठाणे, पुणे आणि अन्य शहरे चोवीस तास सीसीटीव्हीच्या निरीक्षणाखाली आणली आहेत. विविध राष्ट्रीय आणि राज्यातील गुप्तवार्ता संस्था, सुरक्षादले यांचा समन्वय करण्यासाठी राज्य शासन आणि पोलीस महासंचालक हे सतत प्रयत्नशील आहेत. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना देशातील व देशाबाहेरचेही दहशतवाद विरोधी प्रशिक्षण वारंवार देण्यात येत आहे. राज्य शासनाने वेळोवेळी स्पष्ट केले आहे की पोलिसांच्या आधुनिकीकरणासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही.लष्कर-ए-तय्यबा, हिजबुल मुजाहिद्दीनसारख्या पाकिस्तानस्थित दहशतवादी संस्था या काश्मीर आणि अन्य भागातही आपल्या कारवाया करताना दिसतात. त्यातील अनेकांना बांगलादेशमधूनही मदत मिळाल्याचे दिसते. गेल्या वर्षी झालेल्या नोटाबंदीमुळे बनावट नोटांचा प्रसार करून देशाची आर्थिक घडी विस्कटविण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात अयशस्वी झाले आहेत. परंतु ड्रग्ज, शस्त्रास्त्रांची चोरटी आयात व खंडणी आणि गुन्हेगारीत सामील असणा-या व्यक्ती आणि दहशतवादी यांचा जवळचा संबंध आहे. तसेच लहान मुले, स्त्रिया यांना पळवून नेणे आणि जनावरांची तस्करी करणे यांचाही दहशतवाद वाढविण्यास आर्थिक पाठिंबा असतो.या दहशतवादी संघटनांशिवाय माओवादी, मार्क्सिस्ट, लेनिनिस्ट वगैरे नक्षलवादी यांच्यामुळे निर्माण होणारा दहशतवाद पशुपतीपासून तिरुपतीपर्यंत अनेक राज्यांत व शहरांमध्येही वारंवार डोके वर काढत असतो. महाराष्ट्रातील गडचिरोलीचा काही भाग व गोंदिया जिल्ह्याचा काही भाग या ठिकाणी नक्षलवादी, पोलिसांवर तसेच सार्वजनिक बांधकामे करणाºया कंत्राटदारांवर व त्यांच्या वाहनांवर जाळपोळ, हल्ले करताना दिसतात. दहशतवादाचे नवे स्वरूप पाहता त्यामध्ये दहशतवादी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करत असल्याचे आढळते. शाळा, कॉलेजमध्ये जाणारे अनेक तरुण व तरुणी त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडून स्वत:च्या आयुष्याला अनिष्ट वळण देताना दिसतात.महाराष्ट्राच्या काही भागातील तरुण इसिसच्या प्रचाराला बळी पडून इराकमध्ये गेल्याचे निष्पन्न झाले होते. अशा अनेक तरुणांना व तरुणींना दहशतवादविरोधी पथकाने योग्य हाताळणी करून पुन्हा दैनंदिन जीवन जगण्यास प्रोत्साहित केले आहे. त्यात अनेक मुस्लीम धर्मगुरूंनीही सक्रिय सहकार्य दिले आहे. इराक, सिरिया देशातील ‘इसिस’चा जवळजवळ बीमोड करण्यात आला आहे. त्यामुळे तेथून तेलाच्या रूपाने मिळणाºया गैरकायदेशीर निधीस लगाम लागण्याची शक्यता आहे. परंतु त्यात भाग घेणारे दहशतवादी हे अन्य देशात जाऊन घातपात करण्याची शक्यता वाढली आहे. सुरक्षित ठिकाणांवर हल्ला करण्यापेक्षा मशीद, इदगाह, मंदिर अशा धार्मिक स्थळी, तसेच स्टेडियम, बाजार, गर्दीच्या ठिकाणी एकट्या दहशतवाद्याने हल्ले करण्याचे प्रमाण जगातील अन्य देशांत वाढले आहे. सतर्क संरक्षण दले, सुसज्ज पोलीस, चांगले प्रशासन याचबरोबर सामान्य नागरिकांचा प्रशासनाबरोबर सक्रिय सहभाग आणि सदैव जागरूकता या बाबीच दहशतवादाला नियंत्रणात ठेवू शकतील.(लेखक हे महाराष्ट्र पोलीस दलाचे निवृत्त पोलीस महासंचालक व आंतरराष्ट्री दहशतवाद आणि मानवाधिकार चळवळीचे जाणकार आहेत.)

टॅग्स :मुंबई