Join us  

विमान वाहतुक क्षेत्रासमोरील आव्हानांत वाढ, भारतीय विमान कंपन्या बंद पडण्याची भीती 3.3 बिलियन डॉलर्सचे नुकसान होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 8:41 PM

विमान वाहतुक क्षेत्रासमोरील आव्हानांत वाढ, भारतीय विमान कंपन्या बंद पडण्याची भीती3.3 बिलियन डॉलर्सचे नुकसान होण्याची शक्यता

विमान वाहतुक क्षेत्रासमोरील आव्हानांत वाढ, भारतीय विमान कंपन्या बंद पडण्याची भीती3.3 बिलियन डॉलर्सचे नुकसान होण्याची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या जागतिक संकटामुळे भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रासमोरील आव्हानांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर लादण्यात आलेल्या बंदीमुळे हवाई वाहतूक कंपन्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. विमान कंपन्यांसमोर अस्तित्व टिकवण्याचे आव्हान उभे राहिले आहे. भारतीय विमान वाहतूक क्षेत्राला एप्रिल ते जून या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तब्बल 3.3 ते 3.6 बिलियन डॉलर्सचा फटका बसण्याची भीती सेंटर फॉर एशिया पँसिफिक सेंटर (सीएपीए) इंडिया ने वर्तवली आहे. 30 जून पर्यंत भारतीय हवाई वाहतूक क्षेत्र बंद राहील या अंदाजाने ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. मे व जून मध्ये हवाई वाहतूक सुरु झाली तरी यामध्ये फारसा फरक पडणार नाही असा त्यांचा दावा आहे. 

हवाई वाहतूक सुरु झाल्यानंतरही प्रवाशांमधील भीतीचे वातावरण कमी होण्यास व हवाई वाहतुकीकडे नियमित प्रमाणात प्रवासी वळण्यास व परिस्थिती पूर्वपदावर येण्यास मोठा कालावधी लागेल असा अंदाज सीएपीए ने वर्तवला आहे. याचा फटका केवळ हवाई वाहतूक कंपन्यांना नव्हे तर त्यासोबत एअरपोर्ट ऑपरेटर, विमानतळावरील विविध ड्युटी फ्री दुकाने, विमानात व विमानतळावर जेवण, खाद्य पदार्थ पुरवणाऱ्या कँटरिंग कंपन्या, विमानांची देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या एमआरओ उद्योग अशा विविध घटकांना हा फटका बसणार आहे. भारतातील अनेक विमान कंपन्या यामुळे उध्द्वस्त होण्याच्या मार्गावर जाण्याची भीती आहे. अनेक विमान कंपन्यांकडे पुरेसा शिल्लक निधी नसल्याने कंपनीचे व्यवस्थापन कसे करायचे याची काळजी त्यांना लागली आहे. विमान वाहतूक बंद असल्याने त्यांना विमानतळावरील पार्किंगमध्ये विमाने थांबवून ठेवावी लागली आहेत. मात्र विमाने जमीनीवर असली तरी त्या विमानांची देखभाल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विमाने जमीनीवर ठेवण्यासाठी देखील त्यांना आवश्यक शुल्क भरावे लागत आहे परिणामी प्रवाशांच्या माध्यमातून होणारे उत्पन्न बंद असले तरी त्यांचा नियमितपणे होणारा खर्च मात्र सुरुच आहे.  काही कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यास प्रारंभ केला आहे तर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या भत्ते व सवलतीबाबत हात आखडता घेतला आहे.