Join us  

‘वडिलांना भेटण्याची मुलाला जबरदस्ती करू शकत नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 6:55 AM

मुलाला वडिलांना भेटण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही. अन्यथा त्याच्या भविष्याची हानी होईल, असे म्हणत उच्च न्यायालयाने एका वडिलांना त्यांच्या १६ वर्षीय मुलाला भेटण्यास मनाई केली.

मुंबई : मुलाला वडिलांना भेटण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही. अन्यथा त्याच्या भविष्याची हानी होईल, असे म्हणत उच्च न्यायालयाने एका वडिलांना त्यांच्या १६ वर्षीय मुलाला भेटण्यास मनाई केली.

वांद्रे कुुटुंब न्यायालयाने २०१८ मध्ये मुंबईतील सुनील धोंड (बदललेले नाव) यांच्या मुलाचा ताबा आईकडे देत महिन्यातील दोन शनिवारी त्याला ३ ते ५ या वेळात वांद्रे कुटुंब न्यायालयाच्या परिसरात भेटण्याची परवानगी दिली. आदेश दिल्यानंतर तिसऱ्याच वेळी मुलाने वडिलांना भेटण्यास नकार दिला. त्यामुळे वडिलांना मुलाला भेटू देऊ नये, यासाठी मुलाच्या आईने उच्च न्यायालयात याचिका केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अनिल कुरेशी व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे होती.

याचिकेनुसार मुलगा वडिलांना भेटायला गेला, वडिलांनी त्याची बॅग तपासण्याचा हट्ट केला. त्याच्या गुणवत्तेवरून सुनावले. त्यामुळे त्याने वडिलांना भेटण्यास नकार दिला. त्यावर पत्नीने मुलाच्या बॅगेत काही रेकॉर्डर टाकले नाही ना, याची खात्री करून घेण्यासाठी मुलाची बॅग चेक केली. मुलाच्या हितासाठी त्याला ओरडलो, असे वडील म्हणाले.

आईची याचिका मंजूरखुद्द न्यायाधीशांनी मुलाला चेंबरमध्ये बोलावून त्याची मुलाखत घेतली. ‘मुलगा हुशार आहे व समजूतदारही आहे. त्याने वडिलांना भेटण्याचा आग्रह धरू नका, अशी आम्हाला विनंती केली. काही काळ जाऊ द्या. वडिलांच्या भावना दुखावल्याचे तो विसरेल, वडिलांनाही मुलाशी कसे वागायचे असे कळेल,’ असे म्हणत कोर्टाने आईने याचिका मंजूर केली.

टॅग्स :उच्च न्यायालय