Join us  

जुहू बीचव ब्ल्यू बॉटल जेली फीश आले; समुद्रात उतरू नका, स्वतः ला वाचवा

By मनोहर कुंभेजकर | Published: August 11, 2023 11:40 AM

आज सकाळी जुहू बीचच्या जेडब्ल्यू मॅरिएटच्या समोर किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात ब्ल्यू बॉटल जेली फीश आले असंल्याची माहिती जुहू बीच वरील जीवरक्षक सोहेल मुलानी व मनोहर शेट्टी यांनी लोकमतला दिली.

मुंबई - दरवर्षी पावसाळ्यात मुंबईच्या समुद्रकिनारी जेली फीश येतात. गिरगाव चौपाटी,जुहू चौपाटी,आक्सा चौपाटी या प्रमुख ठिकाणी जेली फीशची दहशत असते.ऑगस्ट २०२१ साली  गिरगाव चौपाटीवर जेली फीश चावल्याच्या घटना घडल्या होत्या. तर गेल्या वर्षी जुलैच्या २२-२३ तारखेला जुहू बीच वर जेलिफिश आले होते. यंदा पावसाला उशिरा झाल्याने जेलिफिश आले नव्हते. मात्र आज सकाळी जुहू बीचच्या जेडब्ल्यू मॅरिएटच्या समोर किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात ब्ल्यू बॉटल जेली फीश आले असंल्याची माहिती जुहू बीच वरील जीवरक्षक सोहेल मुलानी व मनोहर शेट्टी यांनी लोकमतला दिली.

या संदर्भात लोकमतच्या दि, २५ जुलैच्या अंकात " चला चला जेलिफिश यायची वेळ झाली" पर्यटकांना खबरदारी घेण्याचे जीवरक्षकांचे आवाहन या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिध्द झाले होते.

आज सकाळी जुहू बीचच्या किनाऱ्यावर जेलिफिश मोठ्या प्रमाणात आल्याने पर्यटकांनी जुहू चौपाटी सह अन्य चौपाट्यांवर समुद्रात पाण्यात उतरू नका ब्ल्यू बॉटल जेली फीश पासून स्वतःला वाचवावे. तर नागरिकांनी अनवाणी पाण्यात उतरू नये, समुद्रकिनारी फिरू नये, असे आवाहन जुहू चौपाटीचे जीवरक्षक मनोहर शेट्टी आणि सोहेल मुलानी यांनी पर्यटकांना केले आहे.

गणपती विसर्जनापर्यंत जेली फीशचा समुद्रात वावर असतो.दर शनिवारी,रविवारी सुमारे २५००० पर्यटक जुहू चौपटीवर येतात. समुद्राचे आकर्षण असते,मात्र पर्यटक आमच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून खोल समुद्रात उतरू नये असे आवाहन त्यांनी केले.

कसे असतात जेली फीश -पावसाळ्यात समुद्राकडून जमिनीच्या दिशेने जोरदार वारे वाहतात.समुद्राला भरती आल्यावर वजनाने हलके असलेले जेली फीश समुद्रकिनाऱ्या जवळ येतात. ब्ल्यू बॉटल जेली फीश हे  विषारी असून साधारणपणे हवा भरलेल्या निळ्या पिशवी सारखे असतात.त्यांच्या टेटॅकल्स पेशीमध्ये विषारी द्रव्य असून ते चावल्यावर असह्य वेदना होतात.पोर्तुगीज मॅन ओ वॉर या नावाने त्यांची ओळख आहे.

जेली फीश चावल्यावर काय करावे -जेली फीशचा मानवी संपर्क झाल्यावर ते कचकचून चावतात. त्यांच्या वेदना असह्य असतात. अश्यावेळी जिकडे त्यांनी चावा घेतला आहे, तिकडे बर्फाने चोळून लिंबू लावावे. जर जखम जास्त असल्यास जवळच्या हॉस्पिटलमध्ये जावे, अशी माहिती निवृत्त जीवरक्षक रजनीकांत माशेलकर यांनी लोकमतला दिली. 

टॅग्स :मुंबई