Join us

मनपासाठी भाजपा-मनसेची जुळवणी

By admin | Updated: August 31, 2015 03:12 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात गेल्या काही दिवसांत सौहार्दपूर्ण संबंध निर्माण झाले असून येत्या

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात गेल्या काही दिवसांत सौहार्दपूर्ण संबंध निर्माण झाले असून येत्या महापालिका निवडणुकीत भाजपा-मनसे समीकरणाची जुळवणी करण्याच्या हालचाली या दोघांनी सुरु केल्याची चर्चा आहे.महापालिका निवडणुकीत भाजपाला रोखण्याकरिता शिवसेना-मनसे हे दोन्ही ठाकरेबंधूंचे पक्ष एकत्र येणार अशी वृत्ते भाजपाच्या गोटातून काही दिवसांपूर्वी पसरवण्यात आली, असे बोलले जाते. लागलीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अपेक्षेनुसार त्याचा इन्कार केला. राज ठाकरे यांनीही हेतूत: अशा अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप करीत शिवसेनेलाच टोले लगावले. ठाण्यातील याच मेळाव्यात बोलताना राज यांनी भाजपावर टीका केली. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर स्तूतीसुमने उधळली. महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून वाद सुरु झाला तेव्हा ब्राह्मण मुख्यमंत्री केला म्हणून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना लक्ष्य केले गेले, असा आरोप केला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच भाजपामधील बहुजन समाजाच्या काही नेत्यांचा हात असल्याचा आरोप करीत राज यांनी फडणवीस यांना जे बोलता येत नाही तेच व्यक्त केले. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत भाजपाने शिवसेनेबरोबर युती केलेली नाही. येत्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजपा-मनसे अशी लढाई अपेक्षित आहे. मागील महापालिका निवडणुकीत मनसे उमेदवारांनी भाजपाला मोठा फटका दिला होता. कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेला रोखायचे असेल तर भाजपा-मनसे यांना उघड अथवा छुपी हातमिळवणी करणे अपरिहार्य आहे. मनसेतील मातब्बर असंतुष्टांना भाजपात प्रवेश न देण्याचा अलिखित करार या दोन पक्षात झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीतही भाजपा-मनसे परस्परपुरक राजकारण करु शकतात. एलईडी दिवे मरीन ड्राईव्हवर बसवण्यापासून जीएसटी लागू करण्यापर्यंत अनेक विषयावरून भाजपा-शिवसेनेत संघर्ष सुरु आहे. (विशेष प्रतिनिधी)