Join us  

राज्यातील ५ हजार ९४७ शाळांची घंटा वाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 4:06 AM

एकूण २५ जिल्ह्यांत शाळा सुरू, ४ लाखाहून अधिक विद्यार्थी उपस्थितलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रातील जवळपास ...

एकूण २५ जिल्ह्यांत शाळा सुरू, ४ लाखाहून अधिक विद्यार्थी उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रातील जवळपास २५ जिल्ह्यांत गुरुवारपासून शाळांची घंटा वाजली. १५ जुलैपासून कोरोनामुक्त असलेल्या गावांमध्ये नियमांचे पालन करून ८ वी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते. त्यानुसार दीड वर्षाच्या कालावधीनंतर राज्यामध्ये एकूण ५ हजार ९४७ शाळांमध्ये ८ वी ते बारावीचे वर्ग भरले. ४ लाख १६ हजार ५९९ विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थिती दर्शविली. ही माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

पहिल्या दिवसाचा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला असून यात टप्प्या-टप्प्याने वाढ होण्याची अपेक्षा अभ्यासक व्यक्त करीत आहेत. सुरू झालेले वर्ग आणि उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये विशेषतः ९ वी, १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांचा समावेश अधिक असल्याची माहिती शिक्षकांनी दिली. विद्यार्थ्यांची सर्वाधिक उपस्थिती ही कोल्हापूर जिल्ह्यात दिसून आली असून ९४० शाळांमध्ये १ लाख ५५ हजार विद्यार्थी उपस्थित होते. इतर जिल्ह्यांचा विचार करता, यवतमाळ, गडचिरोली, नंदुरबार या जिल्ह्यांत २० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली.

राज्यातील दोन हजाराहून अधिक गावांमध्ये सरपंचांनी शाळांची अडवणूक करत एनओसी रोखून धरल्याने आम्हाला शाळा सुरू करता आल्या नाहीत, अशी माहिती महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा)चे संस्थापक अध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांनी दिली. याला जबाबदार असलेल्या लोकप्रतिनिधींवर करवाईची मागणीही त्यांनी केली.

जिल्हा - सुरू झालेल्या शाळांची संख्या - उपस्थित विद्यार्थी

कोल्हापूर - ९४० - १५५७८४

पुणे - ९० - ३५०५

यवतमाळ - ५०२ -२७६१०

नंदुरबार - २२४-२१०२४

सोलापूर- २११-१२३४५

अहमदनगर - १३३- ८२३४

गोंदिया- ११७- ८४७७

जळगाव - ३०६ - १०५७१

गडचिरोली - १९४ - २१११३

धुळे - २६९- १८८२७

उस्मानाबाद - १८५ - १५०८९

नांदेड - ३८४ - ५१११५

अकोला - ३२१ - ९२२८

जालना - ४४७ - १०२९

अमरावती - १८२ - ४७४९

औरंगाबाद - ६३१ - २१५९९

लातूर - १०७ - ६०५२