Join us  

वेळीच द्या विसरण्याच्या सवयीकडे लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 3:17 AM

वय वाढले की विसरभोळेपणा वाढतो. मात्र या विसरभोळेपणाकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे, कारण अजूनही बऱ्याच कुटुंबांमध्ये विसरभोळेपणा हा अल्झायमरचा प्राथमिक टप्पा असल्याविषयी अज्ञान आहे.

मुंबई : वय वाढले की विसरभोळेपणा वाढतो. मात्र या विसरभोळेपणाकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे, कारण अजूनही बऱ्याच कुटुंबांमध्ये विसरभोळेपणा हा अल्झायमरचा प्राथमिक टप्पा असल्याविषयी अज्ञान आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये विसरभोळेपणा आल्यास ही लक्षणे वेळीच ओळखण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. २१ सप्टेंबर या जागतिक अल्झायमर दिनाच्या निमित्ताने ही जनजागृती समाजाच्या विविध घटकांत होणे गरजेचे असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.स्मरणशक्ती व आकलनशक्तीशी प्रामुख्याने संबंधित असलेला ‘अल्झायमर’ हा आजार वृद्धावस्थेत संभवतो. हा आजार असाध्य असला तरी काही प्रतिबंधक उपायांनी तो होऊ नये यासाठी प्रयत्न करता येतो, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी दिली. तर याविषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले, ६५ वर्षे वयानंतर २० टक्के लोकांमध्ये अल्झायमर होण्याची शक्यता असते असा निष्कर्ष अभ्यासातून काढला गेला आहे. या आजाराच्या पहिल्या टप्प्यात स्वत:चे नाव विसरण्यापासून सुरुवात होते. त्यानंतर हळूहळू अवतीभवतीच्या परिस्थितीचे भान न राहणे, नित्य परिचितांची नावे विसरणे, पैशाची देवघेव करताना फारच गोंधळून जाणे, सामान्य गोष्टींचा निर्णय न होणे, कोणत्याही नावीन्याबद्दल अनास्था वाटणे, विचारविश्वांत गुरफटून राहणे, बोलताना शब्द न आठवल्याने अडखळणे, पोशाखाबाबत आवश्यक नेटकेपणाही नसणे इत्यादी लक्षणे सामान्यत: अल्झायमर झालेल्यांमध्ये दिसून येतात. याशिवाय अंतिम अवस्थेमध्ये मलमूत्र विसर्जनाबाबतही भान सुटणे हे अत्यंत विदारक, दयनीय लक्षण असू शकते, असेही त्यांनी सांगितले.>कुटुंबीयांचे समुपदेशन महत्त्वाचे!याविषयी उपचार प्रक्रियेविषयी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कुशल भरवारे यांनी सांगितले, या आजारात मेंदूमध्ये अ‍ॅसिटिलकोलीन हे रसायन वाढविणारी औषधे दिले जाते. तसेच ग्लुटामेट हे रसायन कमी करणारी औषधेदेखील उपयोगी पडतात. तसेच, कुटुंबीयांचे समुपदेशन हासुद्धा महत्त्वाचा भाग असतो. कारण त्यांच्या मनाची तयारी करणे, त्यांना आजाराविषयी शिकविणे, रुग्णाच्या मर्यादा समजून घेण्याची त्यांची क्षमता वाढविणे, याखेरीज रुग्णाची काळजी घेणाºया व्यक्तीला प्रशिक्षण देणे गरजेचे असते.घरामध्ये व्यवस्था व आखणी बदलणे- उदा. रुग्ण वस्तू कुठे ठेवल्यात ते विसरतो, म्हणून त्याच्या कपाटांना पाट्या लावणे. अशा सगळ्या उपचार पद्धतीमुळे ‘अल्झायमर’ या आजाराचे निदान जर लवकर होऊ शकले तर त्यावर उपचार करता येतो, यामुळे रुग्णाचा बुद्धीचा ºहास आपण रोखू शकतो व त्याचे आणि त्याच्या नातेवाइकांचे आयुष्य आपण सुकर करू शकतो.