Join us  

Anvay Naik : अन्वय नाईक कोण होते?, त्यांची आत्महत्या आणि अर्णब गोस्वामींचं कनेक्शन काय?... वाचा

By कुणाल गवाणकर | Published: November 04, 2020 1:57 PM

Anvay Naik Suicide Case Arnab Goswami arrested: रायगड पोलिसांनी आज अर्णब गोस्वामींना मुंबईतून अटक केली

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना (Arnab Goswami) आज रायगड पोलिसांनी अटक केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गोस्वामी यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याविरोधात पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३०६ आणि कलम ३४ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.अर्णब गोस्वामींच्या घरी पोलीस पोहोचले तेव्हा काय घडलं?...पाहा Video२०१८ मध्ये अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमूद यांची आत्महत्याकॉनकॉर्ड डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अन्वय नाईक (Anvay Naik) आणि त्यांच्या आई कुमूद यांनी २०१८ मध्ये रायगडमध्ये आत्महत्या केली. आपल्या आत्महत्येस अर्णब गोस्वामी, फिरोझ शेख आणि नितीश सारडा जबाबदार असल्याचा उल्लेख त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला होता. या तिघांनी आपले ५.४० कोटी रुपये थकवल्याचं अन्वय यांनी सुसाईट नोटमध्ये म्हटलं होतं. अर्णब आणि अन्वय यांच्यात कशावरून वाद झाला?अर्णब गोस्वामी यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये टाईम्स नाऊ वृत्तवाहिनीला रामराम केला. मी सहा महिन्यांत माझी नवी वाहिनी सुरू करेन, असं आव्हान गोस्वामींनी टाईम्स नाऊमधून बाहेर पडताना जैन यांना दिलं होतं. एखादी वाहिनी सुरू करण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागतो. पण गोस्वामी यांनी ६ महिन्यांत वाहिनी सुरू करता यावी यासाठी अन्वय नाईक यांच्यामागे स्टुडियोचं काम लवकर पूर्ण करण्याचा तगादा लावला. अन्वय यांना ६ महिन्यांत काम पूर्ण न करता आल्यानं अर्णब यांनी त्यांच्याकडे असलेलं काम काढून घेतलं. त्यांना स्टुडिओच्या परिसरात येण्यासही मज्जाव केला. यानंतर गोस्वामींनी स्टुडिओचं काम कोलकात्यातील एका इंटिरियर डिझाईनरकडून पूर्ण करून घेतलं, अशी माहिती सुत्रांनी दिली."गोस्वामी भाजप कार्यकर्ते आहेत का? मग त्यांच्यासाठी भाजपकडून इतकी आरडाओरड कशासाठी?"पोलीस तपासातून काय समोर आलं?२०१८ मध्ये अन्वय आणि त्यांची आई कुमूद यांचे मृतदेह रायगडमधील काविर गावी आढळून आले. अन्वय यांचा मृतदेह घराच्या पहिल्या मजल्यावर लटकलेल्या स्थितीत सापडला. तर कुमूद यांचा मृतदेह  तळमजल्यावर आढळला. अन्वय यांच्यावर डोक्यावर मोठं कर्ज होतं आणि त्यांना कंत्राटदारांची देणी देणं कठीण जात होतं, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली.

या प्रकरणात अलिबाग पोलिसांनी २०१८ मध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र २०१९ मध्ये पोलिसांनी प्रकरणाची फाईल बंद केली. यानंतर अन्वय यांच्या मुलीनं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर देशमुखांनी प्रकरणाच्या सीआयडी चौकशीचे आदेश दिले. देशमुख यांनी मे महिन्यात ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली होती. अन्वय यांच्या पत्नी अक्षता यांनी ऑगस्टमध्ये ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत गोस्वामी यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली. 'अर्णब गोस्वामी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरून आरडाओरड करत आहेत. पण गोस्वामी यांच्यामुळे आत्महत्या केलेल्या माझ्या पती आणि त्यांच्या आईचं काय? आमच्या कुटुंबाला न्याय कधी मिळणार? या प्रकरणात आतापर्यंत कोणतीही कारवाई का झाली नाही?,' असे प्रश्न अक्षता यांनी विचारले होते.

टॅग्स :अर्णब गोस्वामीरिपब्लिक टीव्हीअन्वय नाईक