Join us  

उन्हासोबतच मुंबईकरांचा पाणीप्रश्न पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 6:05 AM

जलसाठ्यात झपाट्याने घट; एप्रिलमध्ये तलावांत २७ टक्के साठा शिल्लक

मुंबई : वाढत्या उन्हाबरोबरच या वर्षी मुंबईकरांना पाणीटंचाईची झळही सोसावी लागणार आहे. जलसाठ्यामध्ये झपाट्याने घट होत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जेमतेम २७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईकरांचे टेन्शन वाढणार आहे.

गेल्या वर्षी तलावांमध्ये ९१ टक्केच जलसाठा जमा झाला. मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा तलावांमध्ये असणे अपेक्षित आहे, परंतु १ आॅक्टोबर रोजीच १५ टक्के तफावत निर्माण झाली होती. परिणामी, १५ नोव्हेंबरपासून सरसकट दहा टक्के पाणीकपात लागू केली. उन्हाळ्यात बाष्पीभवनाचे प्रमाण अधिक असल्याने ही तफावत वाढत गेली.डिसेंबर महिन्यापासूनच मुंबईतील अनेक भागांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पाणीकपातीमध्ये छुप्या पद्धतीने वाढ करण्यात आली असल्याची नाराजी सर्वपक्षीय नगरसेवकांकडून व्यक्त होत आहे.

पावसाळ्याला दोन महिने शिल्लक असताना एप्रिलमध्ये तलावात जेमतेम २७ टक्के जलसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात ४० टक्के जलसाठा होता. त्यामुळे पावसाला विलंब झाल्यास पाणीप्रश्न पेटणार आहे.

टॅग्स :मुंबई